Goa News :
गोवा शालान्त मंडळाने मार्च-एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पर्वरी मतदारसंघातील विद्यार्थ्यांचा येथील सुकूर पंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. ‘पर्वरी रायझिंग’तर्फे या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दहावी व बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. सत्कार सोहळ्याला पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे प्रमुख पाहुणे म्हणून तर गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये सन्माननीय अतिथी या नात्याने नात्याने उपस्थित होते. सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश आनंद पाटकर हे प्रमुख वक्ते म्हणून हजर होते.
मुलांपेक्षा पालकांवरच अभ्यासाचे ‘ओझे’ : डॉ. पाटकर
पालकांनी मुलांमागे अभ्यासाचा तगादा लाऊ नये. त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकायला दिले पाहिजे. तरच मुले ताणविरहीत जीवन जगू शकतील. सध्या विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचीच स्थिती अधिक तणावाची दिसते. कारण ते विनाकारण मुलांच्या अभ्यासाचे ओझे आपल्या डोक्यावर घेतात. मुलांना अभ्यासासाठी सुयोग्य वातावरण असावे, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहू नये. सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी त्यांनी इतरही वाचन करणे गरजेचे आहे. अलीकडे वाचनाची सवय सुटत चालली आहे. मात्र विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करावे.
- भगीरथ शेट्ये, अध्यक्ष (गोवा शालान्त मंडळ)
हा सत्कार सोहळा तुमच्या यशासाठी शाबासकी देतानाच तुमच्या यशाची प्रेरणा इतरांना मिळावी यासाठी आहे. तुमच्या यशात पालकांसह, शिक्षक व आपल्या मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा आहे, हे विसरू नका.
- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.