गोव्यातील पहिला फक्त महिलांचा ‘जनमत काैल’

महिलांच्या दृष्टिकोनातून समस्या सोडवण्यासाठी त्यातून निश्‍चित होणार राज्याचा विकास आराखडा
Goa first women Janaman Utsav
Goa first women Janaman UtsavDainik Gomantak
Published on
Updated on

महिलांच्या दृष्टिकोनातून समस्या सोडवण्यासाठी त्यातून निश्‍चित होणार राज्याचा विकास आराखडा ती जगते सर्वांसाठी. घरातल्या प्रत्येकासाठी. तिचे हात राबत असतात, काळजी घेत असतात. तिचे हात राबत असतात, काळजी घेत असतात. घरातल्या बालगोपाळ- वृद्धांपासून ते आल्या गेलेल्यांचं करण्यात तिचा दिवस कसा संपतो तिचं तिलाच कळत नाही. ती रमते घरातल्यांचं करण्यात. पण तिची नजर सर्वत्र असते. काय चांगलं, काय वाईट हे सगळं ती टिपत असते. भलेही घरात तिच्या मतांना मान नसेल पण जेव्हा चार महिला एकत्र येतात तेव्हा ती आपलं मत ठामपणे मांडत असते. आजूबाजूला घडणाऱ्या बदलांचं भान ठेवून ती पुढे जाते. आजवर प्रत्येक निर्णय प्रक्रियेत तिला दुय्य्म स्थान मिळालं. 'तिला काय कळतंय?'

असं गृहित धरून तिला सोयीस्कररीत्या निर्णय प्रक्रियेतून वगळण्यात आलं. विविध स्तरांवर वेगवेगळ्या भूमिका पार पडणाऱ्या खऱ्याखुऱ्या दुर्गांना समाजात मान - प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या उद्देशाने आम्ही ‘जनमन उत्सव’ साजरा करत आहोत. गोमंतकीय महिला ही शांतादुर्गेचा अवतार मानली जाते. परंतु आता तिने शांतता, संयम तोडून रुद्र रूप धारण करायची वेळ आली आहे. आता तिच्या मतांना महत्त्व असेल. महत्त्वाच्या सामाजिक- राजकीय मुद्यांवर ती कोणती भूमिका घेते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. तिचं मतच ठरवणार गोव्याचे भवितव्य.

गोव्याच्या ऐतिहासिक ओपिनियन पोलने गोव्याला घडवलं. त्या ओपिनियन पोल नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही घराघरांतल्या आदिमाया - आदिशक्तीला भेटून त्यांचं मत जाणून घेणार आहोत. त्यांच्या मतांचा आदर करणार आहोत. त्या कोणाच्या तालावर नाचणाऱ्या नाहीत, त्या फक्त ‘मम’ म्हणून मुक्याने संमती देणाऱ्याही नाहीत, याची त्यांनाही जाणीव आहे. फक्त गरज आहे ती मोकळेपणानं व्यक्त होण्याची.

तिचं व्यक्त होणं हे तिच्यासाठी महत्त्वाचं आहेच पण त्याहून अधिक ते गोव्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच खास तिच्यासाठी आम्ही ‘जनमन उत्सव’ साजरा करत आहोत. हा उत्सव आहे तिच्या मताचा आदर करण्याचा, तिच्या अशा आकांक्षा जाणून घेण्याचा. हा उत्सव आहे गोव्यातील माता - भगिनींचा...

कोविडमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे तसेच त्यामुळे निर्माण झालेल्या एकंदर आर्थिक परिस्थितीमुळे बहुतांश परप्रांतीय कुशल कामगार स्वत:च्या गावी परतले होते. कामच उपलब्ध नसल्याने अथवा पुरेसा रोजगार मिळत नसल्याने त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. परंतु, जेव्हा टाळेबंदी शिथिल करण्यात आली तेव्हा कुशल मनुष्यबळाची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवली. आमचे नोकरी-व्यवसाय परप्रांतीयांवरच अवलंबून आहे, याचा प्रत्यय गोमंतकीयांना त्या वेळी प्रकर्षाने आला. त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’, ‘स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पनांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आम्ही स्वयंपूर्ण होण्यासाठी आजच्या युवकांनी आता रोजगारप्राप्तीची क्षमता असलेले शिक्षण घेणे गरजेचे बनलेले आहे. त्यामुळे कुशल शिक्षणाचे महत्त्वही आम्ही जाणून घेणे अनिवार्य आहे. तसेच मेकानिकल/ ऑटोमोबाइल/ आयटी क्षेत्र तसेच आदरातिथ्य, ब्यूटी ॲण्ड वेलनेस, अपॅरेल अशा विविध क्षेत्रांत काम करायला विपुल संधी आहेत, हेही आम्ही ध्यानात ठेवायला हवे. उद्यमशीलतेच्या बाबतीत रस असलेले प्रशिक्षणार्थी अर्थसाहाय्य व मार्गदर्शनाच्या संदर्भात सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

गोव्याकडे आम्ही एक आदर्श राज्य म्हणून पाहातो, जिथे विकासाविषयीच्या नवकल्पनांना मूर्तरूप देताना महिला या अत्यंत महत्त्वाच्या घटकांना सामावून घेता येईल. इथली महिला आजही अप्रत्यक्षपणे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात स्वतःच्या अस्तित्वाचा आणि निर्णयक्षमतेचा ठसा उमटवते आहे. तिला निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणल्यास भावी वाटचालीचे सुस्पष्ट प्रारूप आपल्याला मिळू शकते. यासाठी ‘गोमन्तक’ने गोव्याचे पहिले मराठी दैनिक या नात्याने आपले कर्तव्य पार पाडायचा निर्धार केला आहे. सुजाण गोमंतकीय महिलांचे उत्स्फूर्त योगदान आम्हाला मिळावे, हीच अपेक्षा.

- अभिजीत पवार, व्यवस्थापकीय संचालक, गोमन्तक-सकाळ माध्यम समूह

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com