
डिचोली: राजकारणाच्या नावाखाली कायदा महाविद्यालयासारख्या प्रकल्पाला विरोध करणे, हे गावाच्या विकास प्रक्रियेला बाधक ठरतानाच, भावी पिढीचे भविष्य बरबाद करण्यासारखे आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
मयेतील नियोजित आंतरराष्ट्रीय कायदा महाविद्यालय ही काळाची गरज आहे, असे सांगत कायदा महाविद्यालय प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कडाडताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. सरकारच्या चांगल्या प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांनी मनोवृत्ती बदलावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
मये मतदारसंघात सुमारे ५० कोटी खर्च करून वेगवेगळे पाच प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत या प्रकल्पांची डिजिटल पद्धतीने पायाभरणी केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. वीज, कृषी, जलस्त्रोत आणि पर्यटन खात्याच्या सहकायनि हे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.
मये पंचायत सभागृहात आयोजित या सोहळ्यास उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर, जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, कृषी खात्याचे संचालक, वीज खात्याचे कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत, मयेचे सरपंच कृष्णा चोडणकर, कुडचिरेच्या सरपंच दिया गावकर, सरकारी अधिकारी, विविध आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तलाव, सप्तकोटीश्वर मंदिर आदी पर्यटनस्थळांमुळे मयेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. मयेची ही ओळख कायम ठेवायची असल्यास आणि पर्यटकांना आकर्षित करायचे असल्यास अगोदर गाव स्वच्छ आणि हिरवागार ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केले. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.