एकेकाळी गोव्याची प्रतिमा वाढत्या रस्ते अपघातांमुळे ‘किलर स्टेट’ अशी झाली होती.
तीच स्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे. २०२४ साल सुरू होऊन गुरुवारी १०१ दिवस पूर्ण झाले. या १०१ दिवसांत गोव्यातील रस्त्यांवर ७१ जणांचे बळी गेले असून त्यापैकी ४३ बळी हे दुचाकीस्वारांचे तर आठ बळी दुचाकीवर मागे बसलेले आहेत.
ही बाब चिंताजनक असून या वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाय योजण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या अपघात मालिकेतील शेवटचा जो बळी गेला, ती घटना अत्यंत विदारक या व्याख्येत मोडणारी असून उसगाव येथे बुधवारी सायंकाळी बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या सहा महिन्यांच्या मुलीचा जीव गेला.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
अपघातानंतर संशयित अभिषेक याने कुटुंबीयांना हॉटेलवर पोचवले. नंतर त्याने कार थेट मडगावला नेली आणि मालकाला गाडीची मोडतोड झाल्याचे सांगून ती दुरुस्तीसाठी शोरूममध्ये दिली. गाडीच्या दुरुस्तीसाठी संशयिताने कारमालकाला ४० हजार रुपये दिले. विशेष म्हणजे, त्या कारमालकाकडूनच दुसरी रेन्ट-अ-कॅब घेऊन संशयित हॉटेलवर आला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने संशयिताने हे कृत्य केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी अपघातग्रस्त कारसह दुसरी कारही ताब्यात घेतली आहे.
रेंट अ कॅबचा उच्छाद
१. मागील १०१ दिवसांत ‘रेंट अ कॅब’मुळे पाच गंभीर अपघात झाले असून बहुतेक अपघातांत दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे हे अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे.
२. १७ फेब्रुवारी रोजी हरमल येथे एका पर्यटकाने गाडीचे दार अकस्मात उघडल्याने साईल नाईक (१८) आणि दीप नाईक (२१) या दोन चुलत भावांचा समोरून येणाऱ्या वाहनाखाली येऊन मृत्यू झाला होता.
३. २२ फेब्रुवारी रोजी ‘रेंट अ कार’ चालविणाऱ्या हैदराबादच्या पर्यटकाने मांडवी पुलावर जावेद सडेकर या दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तो उसळून नदीत पडून त्याचा मृत्यू झाला होता.
४. हरमल येथे रशियन पर्यटक ‘रेंट अ बाईक’ घेऊन जात असताना त्याचा तोल जाऊन झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता.
५. ११ मार्च रोजी ‘रेंट ए बाईक’ घेऊन जाणारी आंध्र प्रदेश येथील टी. पूजिथा या २५ वर्षीय पर्यटक महिलेचा दुभाजकाला धडक दिल्यामुळे स्कूटरवरून उसळून पडून दुसऱ्या वाहनाच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला होता.
गोव्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून ही चिंताजनक बाब आहे. हे अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात की सदोष रस्त्यांमुळे, याचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे.
वास्तविक प्रत्येक पोलिस स्थानकात समितीही नेमली आहे. अशा अपघातांचा चिकीत्सक वृत्तीने अभ्यास व्हायला हवा. तसे झाल्यास अपघात नेमके का होतात हे समजेल. त्यासाठी जर उपाय योजले तर अपघात सहज कमी होतील. - रोलंड मार्टिन्स, निमंत्रक, गोवा कॅन.
‘रेंट अ कॅब’ चालक अटकेत
बुधवारी शिरसई येथे राजेंद्र चव्हाण या पादचाऱ्याला एका कारने धडक दिल्याने त्याचा जीव गेला होता. पोलिसांनी तपास केला असता, पुन्हा एकदा रेंट अ कॅब चालविणाऱ्या पर्यटकामुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणात पोलिसांनी ती कार चालविणारा जमशेदपूर (झारखंड) येथील पर्यटक अभिषेक वर्मा याला अटक केली आहे. दरम्यान, नास्नोळा येथे झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू झाला.
दुचाकीचालक ४३
दुचाकीवर मागे बसलेले ०८
पादचारी ०८
अन्य वाहनांचे चालक ०५
वाहनातील सहप्रवासी ०४
बस प्रवासी ०१
सायकलस्वार ०१
अन्य ०१
- सुशांत कुंकळयेकर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.