आजच्या दिवशी १९६३ मध्ये गोव्यात पहिले सरकार सत्तारूढ ; दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांनी घेतली होती शपथ

The first government in Goa was established today in 1963 Bhausaheb Bandodkar was the first Chief Minister of Goa
The first government in Goa was established today in 1963 Bhausaheb Bandodkar was the first Chief Minister of Goa

पणजी :  १९ डिसेंबर १९६१ ला गोवा मुक्त झाला तरी लोकनियुक्त सरकार सत्तारुढ होण्यास २० डिसेंबर १९६३ चा दिवस उजाडावा लागला होता. दोनापावल येथील राजभवनावर २० डिसेंबरला सकाळी १० वाजता पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा शपथविधी झाला. अलीकडे विस्मृतीत गेलेल्या स्मृतिस्थळामुळे चर्चेत आलेल्या मुल्कराज सचदेव या नायब राज्यपालांनी बांदोडकर यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली होती. पहिल्यावहिल्या शपथविधीसाठी त्यावेळी राजभवन सजवण्यात आले होते. प्रशासनाला अशा शपथविधीचा अनुभव नव्हता त्यामुळे कधी काय केले जाते याची उजळणी सुरू होती, रंगीत तालीमही घेण्यात आली. विशेष म्हणजे उपराष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन या सोहळ्‍यास उपस्थित राहणार असल्याने अधिकाऱ्यांवर त्याचेही दडपण होते.


या समारंभासाठी उपराष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन सैन्य एक दिवस आधीच गोव्यात पोचले होते.ते दोन दिवस गोव्यात होते. हवाई दलाच्या खास विमानाने दाबोळी विमानतळावर ते आले. त्यांचे स्वागत करण्यासाठी नायब राज्यपाल मुल्कराज सचदेव, मगोचे विधिमंडळ गटप्रमुख भाऊसाहेब बांदोडकर, नवनिर्वाचित सदस्य, राज्याचे मुख्य सचिव, अधिकारी, उद्योगपती आणि मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. भाऊसाहेब बांदोडकरांनी त्यांना हार घालून त्यांचे स्वागत केले. उपराष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन, गोव्याचे नायब राज्यपाल मुल्कराज सचदेव, राज्यसभेच्या उपाध्यक्षा व्हायोलेट अल्वा यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. सचदेव यांनी आधी बांदोडकर यांना नंतर टोनी फर्नांडिस आणि वि. सु. करमली यांना शपथ दिली. गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर दोन वर्षांनी पहिले लोकनियुक्त सरकार स्थापन झाले; तेव्हाचा हा प्रसंग. त्यानंतर लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.


गोव्याला लोकनियुक्त सरकार मिळावे म्हणून ९ डिसेंबर १९६३ रोजी गोव्यात निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाऊसाहेब बांदोडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष निवडणुकीत उतरला. गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, हे या पक्षाचे उद्दिष्ट होते; तर विरोधात युनायटेड गोवन्स पक्ष. गोवा स्वतंत्रच ठेवून त्याला घटक राज्य करावे; असे त्यांचे उद्दिष्ट होते. तिसरा महत्त्वाचा पक्ष या निवडणुकीत होता; तो म्हणजे कॉंग्रेस. प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष असे अन्य काही पक्ष निवडणुकीत उतरले होते.  नेहरूंच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच या निवडणुकीत जिंकणार, असा अंदाज होता; मात्र झाले भलतेच  भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखालील मगो पक्षाने यश मिळवले. त्यांना १४ जागा मिळाल्या. कॉंग्रेसने साफ आपटी खाल्ली. त्यांना दमणमधील एका जागेवर पक्षाला समाधान मानावे लागले. प्रजासमाजवादी पक्षाला दोन जागा मिळाल्या. एक जागा अपक्षाला मिळाली. ३० जागांच्या विधानसभेत मगो १४, प्रजासमाजवादी २, कॉंग्रेस १ आणि अपक्ष १ असे १८ सदस्य एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापनेसाठी दावा केला. विरोधात राहिले युगोचे १२ सदस्य. भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली असली; तरी त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. मुख्यमंत्री होण्याचे त्यांच्या मनातही नव्हते; मात्र त्यांनाच मुख्यमंत्री होण्याची गळ घालण्यात आली. बहुप्रयत्नांती त्यांनी ती स्वीकारली. मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यानंतर ९ जानेवारी १९६४ रोजी ते विधानसभेत गेले.

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com