
हरमल: कृषी क्षेत्रात सरकारने भरीव कार्य सुरू केल्याचे कागदोपत्री दिसून येते, शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य तसेच सरकार पातळीवर अनेक योजनांचा व घोषणांचा पाऊस आहे. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी येथील शेतकरी बापू विर्नोडकर यांच्या मिरची पिकात बंधारा फुटल्याने खारट पाणी घुसले होते.अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे विर्नोडकर कुटुंबीय हवालदिल झाले. ह्या बागायतीतील उभे मिरचीचे पीक उद्ध्वस्त झाले.
याबाबत त्यांनी पंचायतकडे बंधारा दुरुस्ती साठी अर्ज केला,मात्र विशेष दखल घेतली नाही. त्यांनी कृषी खात्यामार्फत भरपाईसाठी अर्ज केला, मात्र तो प्रस्ताव नाकारला, फाईल परत पाठवली, असे शेतकरी विर्नोडकर यांनी संतापयुक्त सुरात सांगितले.
प्राप्त माहितीनुसार कृषी खात्याच्या अधिकाऱ्यानी स्वतः येऊन पाहणी केली व आवश्यक अहवाल बनवला होता.गेले वर्षभर फाईल खात्याकडे होती, भरपाई मिळेल या आशेने शेतकरी कुटुंबीय निर्धास्त होते. खाऱ्या पाण्यामुळे झालेली पिकाची हानी, नुकसानीच्या कक्षेत बसत नसल्याचे कारण नमूद करून फाईल नाकारली असल्याचे शेतकरी विर्नोडकर यांनी सांगितले.
खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन सर्वेक्षण केले. त्या अधिकाऱ्यांना जर निकष ठाऊक होते, तर त्यांनी सर्वेक्षणाचे नाटक का केले, असा सवाल शेतकरी बापू विर्नोडकर यांनी केला.अधिकाऱ्यांना अर्धवट माहिती असणे धोक्याचे असून, कष्टकरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत न मिळणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी,स्वयंपूर्ण मित्र व सबंधित अधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्यास विमा योजनेचा लाभ व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.