Entrance Examinations : प्रवेश परीक्षांत बाधा नको, यासाठीच निकाल लवकर : भगीरथ शेट्ये
Entrance Examinations :
पणजी,बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षांना सामोरे जाताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, तसेच इतर राज्यांतही प्रवेशासाठी प्रयत्न करण्याची संधी मिळावी, यासाठी कार्यालयीन दिवस न पाहता सुटीच्या दिवशी निकाल जाहीर केला.
मे महिन्यापूर्वी निकाल जाहीर करणाऱ्या देशातील तीन राज्यांमध्ये गोव्याचाही समावेश आहे. गोव्यातही पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात बारावीचा निकाल जाहीर केला आहे, असे मत गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.
गोवा शालान्त मंडळाच्या निकालामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे रविवारी ठरलेल्या वेळेऐवजी काही तास पुढे ढकलला. रविवार असतानाही मंडळाचे कर्मचारी निकाल विद्यार्थ्यांना लवकर समजावा, यासाठी प्रयत्न करत होते.
हा निकाल दुसऱ्या दिवशी, म्हणजे कार्यालयीन दिवशीही जाहीर करता आला असता; परंतु विद्यार्थ्यांची वाटचाल सुरक्षित व्हावी, तसेच चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी ही धडपड होती.
सुटी न घेता अहोरात्र काम करून लवकर निकाल जाहीर करण्याचे ध्येय आम्ही बाळगले होते. मात्र, लवकर निकाल जाहीर करूनही काहीजणांनी टीका केली.
विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुटसुटीत व लवकर निकाल मिळावा, या हेतूनेच परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली होती. त्यांना टार्गेट दिले होते, ते वेळेत पूर्ण झाले, असेही शेट्ये म्हणाले.
काही उच्च माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत तसेच क्रीडा गुण पाठवण्यास उशीर केला, अशा प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केल्या. यासंदर्भात शेट्ये म्हणाले की, अंतर्गत गुण उशिरा मिळालेले नाहीत, तर काही शाळांनी हे गुण ऑनलाईनवरून अपलोड करताना काहीसा गोंधळ झाला. अपलोड करताना गुणांची अदलाबदल झाली. ती दुरुस्त करण्यास शाळांनाच सांगितले आहे. तीन शाळांनी क्रीडा गुण ऑनलाईन अपलोड केले. मात्र, ते मंडळाच्या पोर्टलपर्यंत काही तांत्रिक कारणास्तव पोचले नाहीत. त्यामुळे या त्रुटी लवकरच दूर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
तांत्रिक अडचणही लक्षात घ्या!
गोवा हे छोटे राज्य असून परीक्षार्थींची संख्या कमी असली तरी परीक्षेची प्रक्रिया ही सारखीच असते. २०२० साली शेवटची वार्षिक परीक्षा मंडळाने घेतली होती. कोविड काळात ही परीक्षा झालीच नाही. त्यामुळे मंडळाने यावेळी सॉफ्टवेअर बदलले व तो डेटा सेट करण्यासाठी तसेच मुलांपर्यंत थेट निकाल पाहण्यासाठीची सोय उपलब्ध करण्यासाठी एक तास लागला. ही तांत्रिक बाजू कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, अशी खंत शेट्ये यांनी व्यक्त केली.
टीका निरर्थक :
निकाल सहसा शनिवार, रविवारी किंवा सुटीच्या दिवशी जाहीर केला जातो. पालकांनी घरी विद्यार्थ्यांसोबत निकाल पहावा, हा हेतू असतो. निकालामुळे काही विद्यार्थी टोकाची भूमिका घेण्याची शक्यता असते. त्यामुळे पालक सकाळी किंवा दुपारी निकाल जाहीर झाल्याचा दोष ठेवू शकत नाहीत, असेही भगीरथ शेट्ये म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.