हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासधूस

गव्याकडून नासधूस झालेल्या शेतीची पाहणी करताना शेतकरी बांधव.
गव्याकडून नासधूस झालेल्या शेतीची पाहणी करताना शेतकरी बांधव.

सांगे
काबाडकष्टाने उभी केलेली भातशेतीची गव्याच्या कळपाकडून नासधूस केली जात असल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले उभे पीक वाया जात असल्याने शेतकरी सद्यःस्थितीत चिंतेत आहे. त्यामुळे कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी पिकाची पहाणी करून नुकसान भरपाई द्यावी. तसेच वन खात्याने रानटी जनावराची वेळीच सुरक्षा करायला हवी, अशी जोरदार मागणी भेकरेभाटी-सांगे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. 
यंदा वन खात्याने जंगली जनावरे मुख्य रस्त्यावर येऊ नये व खास करून शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस करू नये म्हणून भेकरे ते वालकीणीपर्यंत सिद्ध डोंगराच्या जंगलातून येणाऱ्या जनावरांचा अटकाव करण्यासाठी लाखो रुपये खर्चून खोल खंदक खणण्यात आले होते. त्यामुळे यंदा जंगली जनावरांचा व खास करून गव्या रेड्यांचा त्रास होणार नाही ही जाणीव लक्षात घेऊन मोठया प्रमाणात शेतकरी शेतात उतरून भातपिकाची रोपण केली होती. अवघ्या महिन्याभरात गव्याच्या कळपाने खंदकावरून उडी मारून भात शेतीची नासधूस करण्यास सुरवात केली आहे. 
आनंद भाटीकर म्हणाले, वनखात्याने तयार केलेल्या खंदकाचा काहीच उपयोग झालेला नाही. प्रशिक्षण दिल्याप्रमाणे गवा खंदकावरून सहज उडी मारून येतात व जातात. शेतीची नासधूस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पंचवीस शेतकरी एकत्र येऊन शेती करतात. मात्र, आतच कुठे रोपण होत असताना नासधूस सुरू झाली आहे.त्यामुळे स्थानिक आमदार, मंत्र्यांनी लक्ष घालून नुकसान भरपाई द्यावी. गव्यापासून भात शेतीची सुरक्षा करण्यासाठी उपाययोजनाही करावी, अशी मागणीही भाटीकर यांनी केली आहे. 

...तर सरकारनेच येऊन पहावे 
शेतकरी पुरसो गावकर म्हणाले, सरकार युवकांना शेती करण्याचे आवाहन करते. परंतु शेती केल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काय पडते ते सरकारनेच प्रत्यक्ष येऊन पाहावे. कष्ट वाया गेले. वन खात्याने केलेली उपाययोजना कुचकामी ठरली आहे. आता वेळीच उपाययोजना न केल्यास पंचवीस शेतकरी उपाशी पडणार आहेत, असेही गावकर यांनी सांगितले. 

जनावरांना मारल्यास सरकार अटक करतो. पण, आमचे पिकाची नासधूस करण्याबरोबच ते खाल्यास कोणाला अटक करणार. महागाईमुळे शेती करणे परवडत नाही. मजुरी, खत, श्रम त्यातून उत्पन्न होण्याआधीच गव्याकडून होणारी नासधूस, यामुळे आमचे आर्थिक नुकसान होण्याबरोबच मनस्तापही सहन करावा लागत आहे. म्हणून सरकारला जर शेतकऱ्यांना मदत देता येत नसेल किंवा रानटी जनावरांबाबत उपाययोजना करता येत नसेल तर सरकारने आम्हाला मारून जनावरांना पोसावे. शेती केल्यास जनावरे त्रास देतात. शेती पडिक सोडल्यास सरकार जमीन ताब्यात घेणार, ही भीती. मग आम्ही करावे तरी काय? 
- राधा गावकर (महिला शेतकरी) 

संपादन ः संदीप कांबळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com