
वाळपई: वाळपई शहरातील काही वीजखांब धोकादायक स्थितीत असून, कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः वाळपई पोलिस स्थानक मार्गावरील व्याघ्रेश्वर इमारतीजवळील मुख्य रस्त्यावर असलेला एक वीजखांब अत्यंत वाकलेला असून, त्याच्या मुळाशी असलेली माती वाहून गेल्यामुळे तो अधिक अस्थिर झाला आहे.
हा वीजखांब भूमिगत वीजवाहिन्यांच्या अलीकडील खोदकामामुळे आणखी कमकुवत झाला आहे. सध्या पावसाळा आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तो मोडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक रहिवाशांनी याकडे लक्ष वेधले असून, हा मुख्य खांब आहे. दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
त्याचप्रमाणे, वाळपई येथील जमा मशिदीसमोर असलेल्या विजेच्या खांबाचीही अवस्था तशीच धोकादायक बनली आहे. या ठिकाणी वाळपई-ठाणे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच मशिदीमध्येही अनेकजण प्रार्थनेसाठी येतात. मशीद समितीने धोकादायक खांबासंबंधी संबंधितांकडे तक्रार दिलेली असून वीज खात्याशी पत्रव्यवहार करून ही स्थिती सांगितली असली, तरी अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
स्थानिक रहिवासी याकुब खान म्हणाले, हा वीजखांब धोकादायक स्थितीत असून कोणत्याही वेळी मोडण्याच्या परिस्थितीत आहे. या ठिकाणी लोकांची वर्दळ असते. आणि सध्या पावसाचे दिवस असल्याने वाऱ्यामुळे तो मोडून अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
४० वर्षांपूर्वी अशाप्रकारे या ठिकाणी असलेला वीजखांब मोडला होता व एका महिलेचा विजेचा धक्काने मृत्यू होण्याची घटना घडली होती. त्यामुळे परत दुर्घटना होण्याआधी संबंधित खात्याने उपाययोजना करून वीजखांब बदलून नवीन खांब घालावा, अशी मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.