
हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानच्या पालखी सोहळ्यावेळी जो वाद निर्माण झाला, त्याला विरोधी गट (सातेरकर) पूर्णपणे जबाबदार आहे. याच गटातील लोकांनी पालखी सोहळ्यावेळी धुडगूस घालून जबरदस्तीने पालखी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
तसेच भंडारी समाजातील लोकांवर हल्ला केला. महाशिवरात्री उत्सवावेळी उद्भवलेल्या वादासही हेच जबाबदार होते, असा आरोप डिचोली तालुका भंडारी समाज समितीचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर आणि सरचिटणीस प्रा. राजेश कळंगुटकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्यातील भंडारी समाज संघटित असून हरवळेतील श्री रुद्रेश्वर देवस्थान प्रकरणी अन्य समाजाचाच नव्हे, तर राजकीय हस्तक्षेपही खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही डिचोली तालुका भंडारी समाज समितीने दिला आहे.
श्री रुद्रेश्वर देवस्थान हे पूर्वापारपासून भंडारी समाजाचेच आहे. हा पुनरुच्चार या समितीने करताना, देवस्थानच्या मुद्यावरून कोणी राजकारण करू नये किंवा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. असा निर्वाणीचा सल्लाही दिला आहे.
आज (मंगळवारी) डिचोलीत घेतलेल्या या पत्रकार परिषदेस समितीचे खजिनदार गिरीश नाईक यांच्यासह तुळशीदास घाडी, राजेंद्र घाडी, बाबूसो गावकर, काशिनाथ ठाणेकर, आत्माराम किनळकर आदी सदस्य उपस्थित होते.
पालखी सोहळ्यावेळी झालेल्या वादाला जबाबदार नसल्याचा दावा जो सातेरकर गटाकडून करण्यात येत आहे, तो दावा पूर्णतः खोटा आहे. तसे असेल, तर पालखी सोहळ्यावेळी या गटातील काही महिलांच्या हातात लाठ्या-काठ्या का होत्या? असा प्रश्न काशिनाथ मयेकर यांनी उपस्थित केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.