Sattari Farmer : काजूला २५० रु. आधारभूत किंमत द्या : सत्तरीतील बागायतदार

Sattari Farmer : सध्याच्या परिस्थितीमध्ये जो भाव प्रतिकिलो काजूला तसेच बोंडूंपासून तयार होणाऱ्या रसाला मिळत आहे, तो शेतकऱ्यांसमोर असलेल्या समस्या पाहता पुरेसा नाही असेच म्हणावे लागेल.
Sattari Farmer
Sattari Farmer Dainik Gomantak

Sattari Farmer :

वाळपई, यंदा काजूचे पीक म्हणावे तसे चांगले आलेले नाही. त्यामुळे काजू बागायतदार संकटात सापडले आहेत. म्हणूनच सरकारने काजूला २५० रुपये प्रतिकिलो आधारभूत किंमत द्यावी, अशी जोरदार मागणी सत्तरी तालुक्यातील काजू बागायतदार वर्गाने केली आहे.

याबाबत बोलताना ब्रह्माकरमळी येथील बागायतदार तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. शिवाजी देसाई म्हणाले की, गोव्याच्या काजूला तसेच काजूच्या बोंडूपासून तयार होणाऱ्या फेणीला प्रचंड मागणी आहे.

तरीसुद्धा काजूला तसेच बोंडूंच्‍या रसाला आजही चांगला भाव मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. सध्या बाजारात काजूला प्रतिकिलो ११० रुपये भाव आहे, तर बोंडूंच्या रसाच्या एका डब्याला ८० ते १०० रुपये मिळतात. सरकारने काजूला प्रतिकिलो १५० रुपये आधारभूत किंमत देणार असे सांगितले आहे. म्हणजे ११० रुपये प्रतिकिलो काजू विकल्यानंतर त्यावर ४० रुपये सरकार देणार आहे. परंतु काजूच्या बोंडूंपासून तयार होणाऱ्या रसाला मात्र आधारभूत किंमत देण्यात आलेली नाही.

सध्याच्या परिस्थितीमध्ये जो भाव प्रतिकिलो काजूला तसेच बोंडूंपासून तयार होणाऱ्या रसाला मिळत आहे, तो शेतकऱ्यांसमोर असलेल्या समस्या पाहता पुरेसा नाही असेच म्हणावे लागेल. गोव्यात अनेक शेतकरी, बागायतदार असे आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह पूर्ण वर्ष काजूच्या बागायतीवर अवलंबून असतो.

एवढेच नव्हे तर आज काजूच्या बागायतीत साफसफाई, मशागत व इतर कामे करण्यासाठी लागणारे जे कामगार आहेत, त्यांची मजुरीही वाढली आहे. काजूचा हंगाम सुरू होण्यापूर्वी एक-दोन महिने अगोदर काजूच्या बागायतीमध्ये साफसफाई करावी लागते आणि त्यासाठी कामगार घालावे लागतात. अनेक बागायतदार यंत्राद्वारे ही साफसफाई करतात आणि त्याकरिता कामगार तसेच इंधन देखील लागते.

बागायतींमध्ये वारंवार रानटी जनावरांचा उपद्रव सातत्याने होत असतो. माकड येऊन काजूच्या मोहराची नासधूस करतात. तर साळींदर व इतर जनावरे रात्रीच्या वेळी बागायतीत घुसून काजूच्या बियांचा फडशा पाडतात. अशा वेळी बागायतदाराने नेमके करावे तरी काय? असा प्रश्न निर्माण होतो.

आज अनेक शेती, बागायती अशा आहेत, जेथे जाण्यासाठी नीट रस्ते नाहीत. आजही अनेक बागायतदार बोंडूंच्या रसाचा डबा स्वतःच्या डोक्यावर घेऊन दारूभट्टीपर्यंत पोहोचवत असतात. तसेच काही गावांमध्ये तर जे लोक दारूभट्टींचे परवाने आणतात, ते गाड्या घेऊन गावामध्ये येतात आणि शेतकऱ्याला मग तो डबा डोक्यावर घेऊन आपल्या शेतातून गावापर्यंत आणावा लागतो.

काजू बागायतदार अजूनही उपराच!

गोव्याच्या काजू फेणीला आज ‘गोव्याचे हेरिटेज’ पेय म्हणून मान्यता मिळालेली आहे. बाजारात या फेणीची किंमत बरीच आहे. तसेच सर्व प्रक्रिया करून जे काजूचे गर विकले जातात त्याला ८०० ते १००० रुपये प्रतिकिलो भाव आहे.

मग प्रश्न हा आहे की शेतकऱ्याला नेमके मिळते तरी काय? खरे म्हणजे सरकारने आज सर्व गोष्टींचा विचार करायला हवा, असे शिवाजी देसाई यांनी सांगितले. कोविडच्या कालावधीत काजूला हमीभाव मिळत नव्हता तेव्हा आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल तत्कालीन कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी घेऊन काजूला हमीभाव देण्याचा निर्णय घेतला.

आज अनेक काजू बागायतदार सरकारी अतिक्रमित जमिनीत पीक घेतात. त्‍यामुळे त्‍यांना सरकारकडून अनुदान मिळत नाही. रानटी जनावरांनी केलेल्‍या नुकसानीची भरपाईसुद्धा वेळेवर मिळत नाही. शेतीला प्राधान्य देणारे निर्णय सरकारला घ्यावे लागतील. काजू बागायतदारांच्‍या समस्या सोडवण्यासाठी सरकारने उपाययोजना आखल्‍या पाहिजेत.

- ॲड. शिवाजी देसाई,

बागायतदार (ब्रह्माकरमळी)

Sattari Farmer
Goa News Update: शनिवारी मोदींची सभा, काँग्रेसची तक्रार, गुन्हे; गोव्यातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा

‘अर्धलीन’ काजू पिकही परवडेना

गोव्यात काही ठिकाणी ‘अर्धलीन’ काजू करतात. म्हणजेच दुसऱ्याची काजू बागायत हंगामामध्ये स्वतःकडे घेऊन जे उत्पन्न मिळते त्यातील अर्धा फायदा काजू बागायतदाराला द्यायचा. पण काजूला व्यवस्थित भाव नसल्‍याने तेही परवडत नाही. यंदा तर हवामान देखील काजू उत्पन्नासाठी पोषक दिसून येत नाही. अनेक काजू बागायतींमध्ये मोहर करपलेला दिसतो आणि त्यामुळे बागायतदार संकटात सापडले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com