
अलेक्झॅंडर बार्बोझा
पर्यटन संबंधित समुद्रकिनारे, वारसा, संस्कृती अशा बाबींमध्ये आता आणखी एक भर पडू पहात आहे, ती म्हणजे कृषी क्षेत्र! गोवा आपल्या पर्यटन क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रत्येक संभाव्य मार्ग शोधत आहे. (तरी देखील 'सूर्य, वाळू आणि समुद्र' आज अजूनही गोव्याच्या पर्यटनाचा युएसपी आहे) पर्यटनामध्ये कृषी क्षेत्राची सांगड घातल्याने पर्यटन वाढीस हातभार लावणे खरेच शक्य आहे काय?
नवीन कृषी धोरणातून कृषी पर्यटनाला चालना देण्याचा हेतू आहे असे अहवाल सांगतो. किमान ४००० चौरस मीटर जमीन असलेले शेतकरी या पर्यटन उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील. असेही कळते की सरकार अॅव्होकॅडो, रेम्ब्युटान आणि पपनस या नवीन नगदी पिकांना प्रोत्साहन द्यायला बघत आहे. या फळांमुळे गोव्यात प्रसिद्ध असलेल्या सध्याच्या फळांमध्ये नक्कीच भर पडेल पण ती पर्यटन वाढीसाठी मदत करू शकतील काय?
कृषी पर्यटन ही गोवा राज्यासाठी पूर्णपणे नवीन बाब असेल कारण हे असे क्षेत्र आहे ज्याला अजून स्पर्श केला गेलेला नाही.
त्यामुळे कृषी पर्यटनाला गोव्यात वाव आहे का हा प्रश्न मनात उद्भवतो. व्यापक दृष्टिकोनातून पाहता गोव्याच्या पर्यावरणीय पर्यटन विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अजून फारसे यश आलेले नाही, अशावेळी कृषी पर्यटन यशस्वी होऊ शकेल काय? अर्थातच यशस्वी होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी आतोनात प्रयत्न करावे लागतील.
गोव्यात काश्मीरप्रमाणे पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या सफरचंदांच्या बागा नाहीत किंवा स्ट्रॉबेरीची लांब पसरलेली शेती नाही. आपल्याकडे नारळाच्या, आंब्याच्या, काजूच्या बागा आहेत, भातशेती आहे, मसाल्याची बागायत आहे.
काही ठिकाणी मसाल्यांच्या लागवडीने पर्यटकांना आकर्षून घेतले आहे, पण भात शेती, नारळांची लागवड आणि आंब्याच्या बागायती तसेच काम करू शकेल काय? सध्याच्या काळात तरी कृषी क्षेत्रात कुठल्याही प्रकारची लक्षणीय वाढ झालेली दिसत नाही, उलट, त्यात घट मात्र झाली आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो.
कृषी पर्यटनाला चालना दिल्याने शेतीला आवश्यक चालना मात्र नक्कीच मिळू शकते कारण गोव्यातील शेतकऱ्यांसाठी ते प्रोत्साहन असेल, जो, शेती उत्पादनात समतोल साधण्यासाठी अजूनही धडपडत आहे.
हॉटेल क्षेत्रातील व्यावसायिक जेव्हा असा दावा करतात की ते त्यांच्या गरजा स्थानिक पातळीवर खरेदी करतात ते वाचणे मनोरंजक असते. गोव्याचे कृषी उत्पादन मर्यादित आहे आणि स्थानिक बाजारसुद्धा राज्याबाहेरून आलेल्या उत्पादनानी भरलेला असतो. मात्र कृषी पर्यटनामुळे कृषी उत्पादनाला चालना मिळून या चित्रात फरक पडू शकतो.
मात्र किती पर्यटक भाताच्या शेतात उतरण्यास किंवा पिकलेली फळे तोडण्यासाठी आंब्याच्या झाडावर चढण्यास तयार होतील? सफरचंदाच्या, स्ट्रॉबेरीच्या किंवा द्राक्षांच्या बागांमध्ये मात्र ते आनंदाने फळे तोडताना दिसत असतात. तथापि सैद्धांतिकदृष्ट्या कृषी पर्यटनातून काही फायदे होऊ शकतात- त्यातून केवळ शेतकऱ्यांची कमाई वाढेल इतकेच नव्हे तर ते पर्यावरण संवर्धनातही मोठी भूमिका बजावू शकेल. मात्र हे घडवून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न होणे आवश्यक आहेत आणि हे प्रयत्न अक्षरशः शेतात दिसले पाहिजेत कारण केवळ कागदी धोरणाने उद्देश साध्य होत नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.