नाणे खणखणीत म्हणजे काय? खरी कुजबूज!

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सोमवारपासून आपल्या प्रचाराला सुरवात केली. आपले नाणे खणखणीत आहे. त्यामुळे मडगावात कोण उभे राहते याची मला पर्वा नाही, असे ते नेहमीच्या तारस्वरात उद्‍गारले.
Goa Assembly 2022 Khari Kujbuj

Goa Assembly 2022 Khari Kujbuj

Dainik Gomantak
Published on
Updated on

१) केंद्रीय मंत्री आले दारी

केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) आणि पर्यटन मंत्री किशन रेड्डी (G. Kishan Reddy) सध्या गोव्यात आहेत. कोणी मंत्री संत्री गोव्यात आला की, भाजप त्याला आपल्या कार्यात ओढून घेते. तसेच घडले आणि आजपासून भाजपचा ‘विशेष व्यक्ती संपर्क अभियान’ सुरू झाला. त्यानुसार मागच्या दहा वर्षातून रिपोर्ट कार्ड घेऊन हे केंद्रीय मंत्री काही राज्य मंत्री, महत्त्वाचे उद्योगपती आणि व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन भेटले. पणजीच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे आपले नेहमीच्या महत्त्वाच्या पाठिराख्या व्यक्ती बोलवून त्यांच्याशीही संपर्क घडवून आणला. कॉंग्रेसमध्ये असे होताना दिसत नाही. पी. चिदंबरम (P. Chidambaram) गोव्यात किती लोकांना भेटले? भाजप किती थोर केंद्रीय मंत्री असो त्यांना सक्तीने कामाला जुंपते. मोदी, शहा यांचीही कमालच म्हणावी लागेल.

२) नाणे खणखणीत म्हणजे काय?

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सोमवारपासून आपल्या प्रचाराला सुरवात केली. आपले नाणे खणखणीत आहे. त्यामुळे मडगावात कोण उभे राहते याची मला पर्वा नाही, असे ते नेहमीच्या तारस्वरात उद्‍गारले. वास्तविक आपले नाणे खणखणीत आहे हे वाक्य तरी पहिल्यांदा ऐकले. त्यांचे नाणे किती खणखणीत आहे हे दुसऱ्याने म्हणायचे असते. काहीजण दिगंबर कामत यांची मनोहर पर्रीकरांशी तुलना करतात. 2012 मध्ये मनोहर पर्रीकर यांनी जिवाचे रान करून प्रचारमोहीम राबवली. निवडणुकीच्या सहा महिने आधी अक्षरशः रस्त्यावर असायचे. त्यांना केंद्रीय भाजपचाही पाठिंबा नव्हता. पेटलेल्या तुफानासारखे ते एकहाती लढत होते. त्यामुळे पक्ष सत्तेवर येऊ शकला. ज्यावेळी लोकांनी भाजपचे (BJP) पाच-सहाही उमेदवार जिंकून येणार नाही, असे भाकीत केले होते तेथे पर्रीकर पक्षाला संपूर्ण बहुमताने सत्तेवर आणू शकले. पर्रीकर यांच्या पश्चात तो वचपा काढण्याची संधी दिगंबर कामत यांना मिळाली होती. गेल्या पाच वर्षांत काय घडले याचा हिशोब लोकांनी लावायचा आहे. मात्र या निवडणुकीत ते सहज जिंकून येतील, हे सांगायला राजकीय पंडिताचीही आवश्यकता नाही.

३) कॉंग्रेसची हालत

गेल्या पाच वर्षांत कॉंग्रेसची झालेली स्थिती याचा विचार केवळ गिरीश चोडणकर हेच नव्हे तर दिगंबर कामत यांनीही तो करायला हवा. भाजपने कॉंग्रेसमुक्त गोवा करण्याचे मनावर घेतले आहेच. शिवाय आम आदमी पक्ष आणि तृणमूलनेही (TMC) कॉंग्रेसचे लचके तोडायचे बाकी ठेवलेले नाही. त्यामुळे उत्तर गोव्यात अक्षरशः तो पक्ष नावाला राहिला आहे. सासष्टीमध्ये कॉंग्रेसचे अनेकजण पक्षाला सोडून गेले. चिदंबरम म्हणतात ते आलेक्स रेजिनाल्ड यांना पराभूत करू शकतात. परंतु सासष्टी तालुका तरी कॉंग्रेसला तारू शकेल काय? हा प्रश्न आहे. याबाबतीत कॉंग्रेसने काही मोहीम चालवली आहे, असे वाटण्यासारखे काही नाही. फुटीरांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा जरी त्या पक्षाने ख्रिस्ती मतांना चुचकारण्यासाठी केली असली तरी अल्पसंख्याक मते आपल्याबरोबर राहणार का? याचीही त्या पक्षाला खात्री नाही. अनेक मतदारसंघात त्यांच्याकडे उमेदवारही नाहीत.

४) काणकोणमध्ये धक्का

काणकोण मतदारसंघात इजिदोर फर्नांडिस यांनी परिस्थिती ओळखून अपक्ष म्हणून प्रचाराला सुरवात केली आहे. तेथे रमेश तवडकर कमळ घेऊन जाणार याचा पत्ता लागताचक्षणी त्यांनी आपला मोहरा बदलला आणि ते कामालाही लागले. सध्या काणकोणमधील 60 टक्के भाजप मंडळ त्यांच्याबरोबर आहे. भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते सर्वजण इजिदोरबरोबर जाणार असल्याने भाजपला तो एक मोठा धक्का ठरणार आहे. कारण हे मंडळ इजिदोर यांनीच नेमले होते. गेल्या दोन-तीन वर्षांत त्यांचा सर्व खर्च त्यांनी केला. त्यामुळे ते पक्षाबरोबर राहणे शक्य नाही. सध्या इजिदोर कॉंग्रेसमध्ये जायला तयार नाहीत. परंतु पांढरी टोपी घालून आपली राजकीय निष्ठा मध्यममार्गी विचारसरणीकडे आहे हे दाखवत ते फिरत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com