
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ या दोन्ही खेळाडूंविरुद्ध भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) तक्रारीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सुनावणी घेणार असल्याचे वृत्त आहे. जर या सुनावणीत ते दोषी ठरले, तर पाकिस्तान संघाला भारताविरुद्धच्या निर्णायक सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसू शकतो.
१४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध भारताने मिळवलेल्या विजयावेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत एक भावनिक विधान केले होते. त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली आणि "हा विजय ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी भारतीय सैन्याला समर्पित" असल्याचे म्हटले होते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) या विधानाला आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे होते की क्रिकेट मैदानावर राजकीय संदर्भ देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांनी आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती.
२५ सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यासह बीसीसीआयचे सीओओ हेमांग अमीन आणि क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर समर मल्लापूरकर यांनी मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर बाजू मांडली. सूर्यकुमारनं स्पष्ट केलं की त्यांच्या विधानामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता.
आयसीसीने त्याच्यावर कठोर कारवाई न करता केवळ समज देण्याचा निर्णय घेतला. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार लेव्हल १ प्रकारातील गुन्ह्यासाठी सामान्यतः समज किंवा सामना शुल्काच्या १५% दंडाची शिक्षा असते. मात्र, सूर्याला फक्त समज देण्यात आली.
दरम्यान, बीसीसीआयने पाकिस्तानच्या हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानविरूध्द गैरवर्तन केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी २६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
वृत्तानुसार, सामन्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी भारतीय चाहत्यांशी वाद घातला होता आणि काही अपमानास्पद टिप्पणीही केली होती. त्यामुळे बीसीसीआयने याबाबत औपचारिक तक्रार केली. जर सुनावणीत ते दोषी ठरले, तर त्यांच्यावर निलंबनासह गंभीर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या ऐतिहासिक लढतीपूर्वी पाकिस्तान संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू गमावण्याची शक्यता संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
दुसरीकडे, भारतीय संघासाठी ही एक मोठी मानसिक बढाई ठरू शकते, कारण प्रतिस्पर्धी संघ अंतिम सामन्यात अपूर्ण शक्तीसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.