
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागात कार्यरत असलेल्या एका उपनिरीक्षकाने सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गुन्हेगार पकडून जप्त केलेले २ कोटींहून अधिक रुपये पीडितांना परत करण्याऐवजी स्वतःच हडप केले. विशेष म्हणजे, त्याने आपल्याच उपनिरीक्षक मैत्रिणीसोबत हे पैसे घेऊन पलायन केले आणि गोवा, मनाली, काश्मीर अशा पर्यटन स्थळांवर उधळपट्टी केली.
आधीच विवाहित असलेल्या या दोघांना बनावट ओळखपत्रांनिशी नवीन आयुष्य सुरू करायचे होते, मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांचा हा कट उधळला.
उत्तर-पूर्व जिल्ह्याच्या सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला उपनिरीक्षक अंकुर मलिक याने जप्त केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम बनावट तक्रारदारांच्या नावाने न्यायालयाकडून आदेश मिळवून स्वतःच्या ओळखीच्या लोकांच्या बँक खात्यांमध्ये वळवली. २०१२ च्या बॅचचा असलेल्या मलिकने पैसे वळवल्यानंतर सात दिवसांची वैद्यकीय रजा घेतली आणि परतलाच नाही. त्याच सुमारास, त्याच बॅचची त्याची मैत्रीण नेहा पुनिया, जी जीटीबी एन्क्लेव्ह पोलिस ठाण्यात कार्यरत होती, ती देखील गायब झाली. या दोघांच्याही बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
तपासादरम्यान, या पोलिस अधिकाऱ्याने सायबर फसवणुकीतून मिळालेली करोडो रुपयांची रक्कम हडप केल्याचे समोर आले. अंकुर मलिक आणि नेहा पुनिया दोघेही विवाहित आहेत. मलिकची पत्नी उत्तर प्रदेशातील बरौत येथे राहते, तर पुनियाचा पती दिल्लीतील रोहिणी परिसरात राहतो. तपासात असेही उघड झाले की, २०२१ मध्ये पोलिस प्रशिक्षणादरम्यानच त्यांची मैत्री झाली होती आणि पोलिसांनी दावा केला आहे की, या फसवणुकीचा कट तिथेच रचण्यात आला होता. शोध पथकाने तांत्रिक पाळत आणि जमिनी स्तरावरील गुप्त माहिती गोळा करून या बेपत्ता उपनिरीक्षकांचा मागोवा घेतला. चार महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर अखेर त्यांना इंदूर येथे शोधून अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने, १२ लाख रुपये रोख, ११ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, तीन एटीएम कार्ड आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. फसवणूक केलेल्या पैशातून त्यांनी सोने खरेदी केले होते, जेणेकरून पैसे सहजपणे लपवता येतील, असे पोलिसांनी सांगितले.
या फसवणुकीत सहभागी असलेले आणखी तिघे मोहम्मद इलियास, आफी उर्फ मोनू आणि शादाब ज्यांच्या खात्यात चोरीचे पैसे हस्तांतरित केले होते, त्यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अंकुर मलिकला माहित होते की जप्त केलेल्या रकमेवर कोणीही दावा करणार नाही, त्यामुळे त्याने खोटी कागदपत्रे सादर करून न्यायालयाकडून पैसे काढले आणि पलायन केले.
पोलिसांनी सांगितले की, "या पैशांनी त्याने गोवा, मनाली आणि काश्मीरसारख्या ठिकाणी प्रवास केला." इंदूरला पोहोचल्यानंतर त्याने रोख रकमेच्या बदल्यात सोने खरेदी केले, जेणेकरून मागोवा घेणे कठीण होईल. त्यांची योजना होती की बनावट ओळखपत्रे तयार करून मध्य प्रदेशातील डोंगराळ भागात नवीन आयुष्य सुरू करावे. या फसवणुकीत आणखी कोण सहभागी आहे, याचा तपास पोलिस करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.