goa
goaDainik Gomantak

जीवन त्‍यांनाच कळलं

मंदिरामध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर घंटानाद करायचा. ह्या घंटेच्‍या आवाजानं मन थाेडं शांत होतं. मग मुर्तीचं दर्शन. थोडं नामस्‍मरण करुन एक दहा मिनिटं ध्‍यानस्‍त बसायचं.

डॉ. व्‍यंकटेश हेगडे

एक सुंदर घटना घडलीय. आम्‍हाला हा मनुष्‍यजन्‍म मिळालाय. हा सुंदर देह मिळाला आणि मनही. बुद्धी, कर्तृत्‍व, शक्‍ती, संस्‍कार, संस्‍कृती, समाज सर्व कांही मिळालं. पण आपलं जीवन जर असं सुंदर, निर्मळ आणि अद्वितीय व्‍हायचं असेल, तर आम्‍ही आमची बुद्धी, शक्‍ती, वापरून काही सुंदर गुण आपणांमध्‍ये अंगिकारावे लागतील.

आम्‍ही जन्‍माला आलो. लहान होतो तेव्‍हा असा कणाकणांत उत्‍साह होता. सदैव ओठांत हसूं होतं. मन शांत आणि तिथं मानवी मूल्‍यं म्‍हणून शांती प्रेम व आनंद उत्‍साह असा कणाकणांत होता. सदैव प्रत्‍येक क्षणी हाेता.पण आपण वाढलो तेव्‍हा राग, लोभ,मद, मत्‍सर, वासनासारखे विकार जडले.

ही गोष्‍ट आठवायला कारण, आज मानवामध्‍ये मानवी मूल्‍यं रसातळाला जात आहेत. मग कुणी दुसऱ्याच्‍या जीवाची पर्वा न करता दारू पिऊन भन्नाट गाडी चालवील आणि कुणा भाबड्याचा जीवही घेईल. लग्‍नाचं नातं तुडवून बाहेरख्‍यालीपणा करेल. कुणाच्‍या हातून खून, मारामाऱ्या होतील.

ज्‍यांनी आपलं सर्वस्‍व देऊन आपणास वाढवलं, शिकवलं, चांगले संस्‍कार केले त्‍या आपल्‍या आई-वडिलांना वृद्धाश्रमांत ठेवेल. पैशाच्‍या मोहापायीं किंवा अतिवासनेतून कुणाचा विश्र्‍वासघात करील. नातीं तुडवत बहीण-भावामध्‍ये द्वेशाच्‍या भिंती उभ्‍या राहतील. आज समाजांत मानवी मूल्‍यं कमी होताहेत. समाज रसातळाला जात आहे.

खरं तर आमच्‍यातलं देवत्‍व खुललं तर प्रेम, सेवा, करुणा, शांती आणि आनंद ह्याचा अगदी महापूर समाजात येईल. पण आज समाज हादरतोय. ह्या गाेमंत भूमीला पोर्तुगीजांनी पिडलंय. पण आज बऱ्याच ठिकाणी आपलीच माणसं आपलं जगणं कठीण करताहेत. गाेव्‍यामध्‍ये देवळं आहेत पण अनेकांना देवळं समजलेली नाहीत. उमगलेलीही नाहीत.

अनेक देवस्‍थानांमध्‍ये वादविवाद, एकमेकांबद्दल द्वेष आणि गर्व सोडाच पण अगदी मद फोफावतोय. येथे उत्‍सवातही खालच्‍या प्रतिचं राजकारण चाललंय. देवळांतला देव हा मूर्तिरूपांत आहे. पण देवळांतल्‍या देवाचं दर्शन घेताना, स्‍वत:मधलं देवत्‍व अनुभवायचं आहे. ह्यासाठी मनामध्‍ये सात्‍विकता हवी. सात्‍विक मन देवत्‍वाशी तादात्‍म्‍य पावतं. म्‍हणून आपल्‍या पूर्वजांनी अनेक योजना राखलेल्‍या आहेत. अगदी सामान्‍य पूजेपासून मोठी होमहवनं आणि अनुष्‍ठानं. एखादं व्रत सुद्धां.

मंदिरामध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर घंटानाद करायचा. ह्या घंटेच्‍या आवाजानं मन थाेडं शांत होतं. मग मूर्तीचं दर्शन. थोडं नामस्‍मरण करून एक दहा मिनिटं ध्‍यानस्‍त बसायचं. मनातला ताणतणाव किंवा रागासारख्‍या राक्षसी भावना ह्याबद्दल जागृत होत. देवाच्‍या पायांशी त्‍याचं समर्पण करायचं. मन शांत व्‍हायला हवं. ध्‍यानासाठी एखाद्या गुरुकडून मंत्र घेतला, ध्‍यानाच्‍या आध्‍यात्‍मिक मनस्‍थितींत गेलांत तर मन शांत शांत होतं. देवाला भेटणं म्‍हणजे अशा शांत मनस्‍थितींत जाणं.

माझ्‍या ह्या गोव्‍याच्‍या भूमीची आध्‍यात्‍मिक प्रगती खूप व्‍हायला हवी. ह्यासाठी गुरु हवा. सद्‍गुरु आपणांस देवाचा साक्षात्‍कार घडवील. आपली आध्‍यात्‍मिक प्रगती घडेल. आध्‍यात्‍म म्‍हणजे इथे धर्म नाहीच. ‘‘देवाच्‍या गुणांत येणं.’’ वरिष्‍ठांच्‍या प्रति आदरभाव असणं. कनिष्‍ठांच्‍या प्रति करुणाभाव बाळगणं. आपल्‍यामुळे कुणालाही त्रास होऊ नये असं वागणं, वेद वाचण्‍यापेक्षा वेदना वाचता येणं, आणि कुणाला वेदनामुक्‍त करण्‍यासाठी सर्वस्‍व देणं.

कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्‍य पार पाडणं, निरपेक्ष सत्‍कर्म करीत रहाणं. सर्वांवर अविरत अटिविरहित प्रेम करणं. अगदी मुक्‍या प्राण्‍यांवर व पशू पक्षांवर सुद्धां. निरपेक्ष सत्‍कर्म करीत रहाणं. निस्‍वार्थी सेवाभाव जोपासणं. सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणं. विना अपेक्षा कौतुक करणं. सर्वाशी आपुलकी ठेवणं. आपण समाजाचं काही देणं लागतो, आणि ते देणं आपण फेडलं पाहिजे अशी मानसिकता ठेवत, गरजूंना हवी ती मदत करणं. आपल्‍याबरोबर सर्वांची प्रगती होवो हा भाव अंतरांत असणं. साधं सरळ आणि निर्मळ असणं. चांगलं कर्म करणं आणि कर्तव्‍य पारदर्शक पद्धतीनं पार पाडणं.

आमच्‍या समाजांत गुरु अध्‍यात्‍म शिकवतात. श्री श्री रविशंकरांसारखे ध्‍यान अगदी सोप्‍या पद्धतीनं शिकवतात. अनेक ठिकाणी विद्याधीश स्‍वामींनी सध्या ‘‘श्री राम जय राम जय जय राम’’ नामजपांतून परमेश्र्‍वराशी एकरूप व्‍हायचे कार्य सुरु केलंय हें स्‍तुत्‍य आहे. कुंडईमध्‍ये तर ब्रम्‍हेशानंद स्‍वामीजींनी उत्तुंग कार्याचा डोंगर उभारलाय.

सत्‍यसाईबाबा हे गोव्‍यात येणारे पहिले गुरू. आज साईबाबाचं कार्य स्‍मरून अनेक मंदिरे गोव्‍यात आली आणि प्रचंड संख्‍येने साईभक्‍त आपली भक्‍ती अर्पण करताहेत. श्री गोंदवलेकर महाराज, श्री प्रभुपाद स्‍वामी, कलावती आई आदिंचेही गोव्‍यात खूप भक्‍त आहेत. ह्या भक्‍तांनी अनेक ठिकाणी एकत्र येऊन साधना करण्‍यासाठी अनेक मंदिरं उभारलींत. एक खरं. आपल्‍या देवाबरोबर देवाच्‍या निकट नेणारा गुरू हवाच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com