
सर्वेश बोरकर
जयनगर साम्राज्याच्या स्थापनेनंतर अवघ्या काही दशकांत जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत या साम्राज्याने जिंकला होता, गोव्यात इ. स. 1380 ते इ. स. 1470 अशी अनेक दशके विजयनगर साम्राज्याच्या अंतर्गत गोव्याची भरभराट झाली.
एवढ्या विशाल साम्राज्याचा महान प्रतापी राजा श्री हरिहर द्वितीय याने इ.स. 1344 ते इ. स. 1404 या त्याच्या कालावधीच्या अंतर्गत विजयनगर साम्राज्य अनेक प्रांतांमध्ये किंवा राज्यांमध्ये विभागले. कोकण (कोकण-राज्य), उत्तर कानरा आणि दक्षिण कानरा (बाराकुर-राज्य आणि मंगळुरू-राज्य), उत्तर आंध्र (उदयगिरी-राज्य) आणि दक्षिण आंध्र (चंद्रगिरी-राज्य), उत्तर तमिळ (पदैविदु-राज्य), दक्षिण तमिळ (पांडिया-राज्य) आणि पूर्व तमिळ (मुलुवाई-राज्य) अशी विभागणी केली गेली.
सुरुवातीला प्रांतांचे प्रशासन मोठ्या प्रमाणात विकेंद्रित केले गेले होते, जिंकलेल्या क्षेत्रांना स्थानिक सरदारांच्या आधिपत्याखाली सामंत म्हणून राज्य करण्याची परवानगी होती. तथापि, जसजसा काळ बदलत गेला, विजयनगर (आज जे हंपी म्हणून ओळखले जाते) या त्यांच्या भव्य राजधानीच्या शहरातून बाहेर पडून, त्यांच्या प्रजेवर नियंत्रण मजबूत करण्यासाठी केंद्रीकरण केले गेले.
याच हेतूने, 29 ऑगस्ट 1380 रोजी श्री हरिहर द्वितीय याच्या आदेशाने बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकल्यानंतर लगेचच श्री मल्लप्पा वोडेयर म्हणजेच विरा वसंत-माधव राया (श्री माधव मंत्री) याला कोकण-राज्याच्या महाप्रधानाचा दर्जा देण्यात आला, ज्याची राजधानी गोपकापट्टण किंवा गोवा होती.
श्री माधव मंत्री त्या पूर्वी एकाच वेळी बाराकुर-राज्य(दक्षिण कानरा) आणि उत्तर कानराचा राज्यपाल म्हणून काम पाहत होते, विजयनगर साम्राज्याचा राजा श्री हरिहर द्वितीयच्या दरबारातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यांने संपूर्ण कोकण- कर्नाटक किनारपट्टीवर राज्य केले.
कदंबपुरी(चंद्रपूर) लोकांचा रक्षक, वरदानाचा स्वामी व गोवापुरीचा वीर वसंत-माधव मल्लप्पा वोडेयार अर्थात श्री माधव मंत्री त्यांनी इ. स.1390 पर्यंत दहा वर्षे कोकणवर राज्य केले, त्यानंतर सत्ता त्यांच्या- श्री नरहरीराया नावाच्या मंत्र्याकडे देण्यात आली.
तथापि, इ. स. 1396 मध्ये, श्री माधव मंत्री यांचा मुलगा श्री बचप्पा वोडेयर राया यांना कोकण-राज्याची गादी देण्यात आली. बहामनी सल्तनतच्या ख्वाजा महमूद गवानने इ. स. 1470 मध्ये गोवा पुन्हा जिंकला, त्यानंतर तो विजापूरच्या आदिल शाह आणि अखेरीस पोर्तुगिजांच्या ताब्यात इ. स. 1510 मध्ये गेला.
श्री माधव मंत्री यांच्या प्रशासकीय कौशल्यासाठी व नार्वे, दिवाड येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आज त्यांना आदराने ओळखले जाते, ज्यापैकी आताच्या श्रीसप्तकोटेश्वर मंदिराची पुनर्बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1668 मध्ये नवीन नारवा किंवा डिचोली - नार्वे येथे मांडवी नदीच्या पलीकडे हिंदळे या गावी केली होती.
गोव्याच्या समृद्धी आणि कल्याणासाठी वीर वसंत-माधव वोडेयार अर्थात श्री माधव मंत्री यांनी गोव्यात अनेक अग्रहार, ब्रह्मपुरी, तलाव व दगडी बांध बांधण्यासह, संपूर्ण कोकण-राज्यातील असंख्य सिंचन प्रकल्पांमधील त्यांचे योगदान काळाच्या ओघात अज्ञात राहिले आहे.
प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातही शिक्षणाचा धर्माशी खोलवर संबंध होता. गणित, खगोलशास्त्र, तर्कशास्त्र आणि व्याकरण या विषयांव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांनी वेद, वेदांग, पुराणे आणि इतिहास या विषयांचा अभ्यास करणे आणि त्यात प्रभुत्व मिळवणे अपेक्षित होते.
त्यासाठी गोव्यातही विजयनगर साम्राज्याने अग्रहाराच्या नावाची ‘निवासी महाविद्यालये’ सुरू केली. ज्यामध्ये पुरोहितांना जमीन अनुदान देण्यात आली होती, ज्यांना या जमिनींवर स्वायत्तपणे शासन करण्याची परवानगी होती आणि मंदिरे, टाक्या आणि इतर जे काही हवे ते बांधायला परवानगी होती.
वाचनस्रोत: डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर - ‘ओ ओरिएंट पोर्तुगीज’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.