रणरणते ऊन आणि वाळवणाचे पदार्थ

आमच्या वाड्यात ही सगळी 'वाळवणा'ची कामं सामूहिक असायची. आजही महिला सामूहिक पद्धतीने ही कामं करतात. वाड्यात त्यावेळी राहणार्‍या घारगे काकूंचं वाळवण सर्वात आधी तयार व्हायचं.
goa
goaDainik Gomantak

मनस्विनी प्रभुणे-नायक

उन्हाळा येतानाच आपल्यासोबत कितीतरी सुवास घेऊन येतो. कच्च्या कैरीचा, पिकलेल्या आंब्याचा, मोगरा-बकुळ आणि सुरंगीच्या फुलांचा आणि आणखी एक घरभर दरवळणारा सुवास जो आता हरवू लागला आहे, तो म्हणजे गव्हाच्या चिकाचा.

कदाचित काही गोमंतकीयांना हा गव्हाचा चीक आणि तो शिजत असताना घरभर पसरणारा सुवास अपरिचित असणार. उन्हाळा सुरु होताच महिलांनी सामूहिक पद्धतीनं वाळवणाचं काम करायचं ठरून गेलेलं असतं. वाड्यात बालपण गेलेलं असल्यामुळे उन्हाळ्याचा काळ सुरु  होताच 'नॉस्टॅल्जिक' व्हायला होतं. एक काळ असा होता की पूर्ण वर्ष उन्हाळ्याच्या सुट्टीची आतुरतेनं वाट बघितली जायची.

वर्षभरात शाळेला सर्वात मोठी सुट्टी याच काळात मिळायची. उन्हाळा आणि सुट्टी असं समीकरण असलं तरी उन्हाळा आणि वाळवणाची कामं हेही एक आमच्या वाड्याचं समीकरण होतं. आमचा वाडा छान ऐसपैस होता. सुंदर, आखीव रेखीव  चौसपी अशी पुढे-मागे दोन अंगणं होती.

पुढच्या अंगणात नाही पण मागच्या अंगणात वाड्यातील बायकांचं राज्य होतं. कधी भोंडला, तर कधी कुणाचं डोहाळ जेवण याच अंगणात होत असे. उन्हाळ्यात तर या अंगणाची वाटणी व्हायची ती उन्हाळी वाळवणाच्या कामासाठी. या सगळ्या कारणांमुळे मागच्या अंगणाला कायम जागतेपण असायच.

उन्हाळी 'वाळवण' ही पुढच्या वर्षभरासाठी केली जाणारी बेगमी म्हणजे साठवणूक असते. जसा आपण पुरूमेंत करतो तसंच वाळवण कामात स्वयंपाकघरात वर्षभरासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींना बनवल्या जातात.

 महिलांनी आजही ही पद्धत जपून ठेवलीय. आपली खाद्यसंस्कृती इतक्या विविध खाद्यप्रकारांनी आणि खाद्यपदार्थांनी  समृद्ध आहे. त्यात वाळवणाचं  वेगळं महत्व  वाटतं. भात-वरण, भाजी-पोळी, चटणी-कोशिंबीर या पदार्थांइतकंच ताटात पापड, कुरडई-पापडी, सांडगे, लोणचं यासारख्या वाळवणातून आलेल्या, तळलेल्या  कुरकुरीत पदार्थाना महत्व असतं.

उन्हाळ्याच्या काळात शेजारपाजारच्या अंगणात मुद्दाम डोकावून यावं असं वातावरण असायचं. अंगणात कोणी काय वाळत घातलंय हे तिथं डोकावताच समजायचं. खरं तर तिथे डोकावण्याच्या आधीच दूरपर्यंत पसरणाऱ्या वासाने समजून जायचं. त्यात तोंडाला पाणी सुटेल असा गव्हाच्या चिकाचा वास असायचा.

गव्हाचा चीक करणं म्हणजे एक मोठा सोहळा. तीन दिवस आधी गहू भिजत घालणं, रोज त्यातलं पाणी बदलणं मग ते गहू बारीक वाटून त्याचा रस वेगळा आणि वाटलेल्या गव्हाचा चोथा वेगळा करणं.

मग त्या गव्हाचा रस गाळून तो शिजवणं हे सगळं करताना वाड्यातील अनेक काकूंना  बघितलंय. तो गव्हाचा रस जेव्हा शिजवायला घेताच अफलातून वास घरभर पसरतो. शेजारीपाजाऱ्यांना मुद्दाम सांगावं लागत नाही. वासच सर्वांपर्यन्त कशाची तयारी चाललीय हे सांगून येतो.

आमच्या वाड्यात ही सगळी 'वाळवणा'ची कामं सामूहिक असायची. आजही महिला सामूहिक पध्दतीने ही कामं करतात. वाड्यात त्यावेळी राहणाऱ्या घारगे काकूंचं वाळवण सर्वात आधी तयार व्हायचं. कुरडयांचा चीक तयार करण्याचं किचकट काम त्या मोठ्या कौशल्याने करायच्या. चीक शिजत असताना पूर्ण वाडाभर त्याचा घमघमाट सुटायचा.

खूप हावरटासारख्या आम्ही सगळ्या मुली घारगे काकूंच्या वाळवणाच्या पदार्थांवर लक्ष ठेवून असायचो. त्यांच्या घरी चीक बनवायला सुरुवात झाली की  आम्ही सगळी मुलं  वाटी चमचा घेऊन त्यांच्या  घरी  पोहायचो. वाटीत  चीक आणि त्यावर तुपाची धार पडली कि सगळे अंगणात जाऊन खात बसायचो.

मग पुढचा तासभर शांतता असायची. दुसरीकडे याच गरम गरम चिकाच्या भराभर कुरडया घालायची लगबग सुरू असायची. चकलीच्या सोऱ्यातून नाजूक धाग्यांसारख्या गोल गोल आकारात पडणारा पांढरा शुभ्र चीक कुरडईचं रूप घ्यायचा. कुरडया घालत असताना त्या सगळ्या प्रक्रियेचं निरीक्षण करायला आवडायचं.

कुरडया झाल्या की काकू साबुदाण्याच्या पापड्या करायच्या. प्लास्टिकच्या पेपरवर व्यवस्थित ओळीत पापड्या घालण्याचे काम आम्ही लक्षपूर्वक बघत बसायचो. या अर्धवट वाळलेल्या, थोड्याशा ओल्या, थोड्याशा वाळलेल्या  पापड्या खायला असल्या भारी लागायच्या. वाड्यात दुपारी शुकशुकाट असायचा.

याचा फायदा उठवून आम्ही काकूंच्या साबुदाण्याच्या पापड्यांवर डल्ला मारायचो. त्या वाळत घातलेल्या पापडया तिथून उचलून खाल्ल्या की त्या पेपरवर पापडीचा ठसा उमटलेला असायचा  आणि एक रिकामी जागा तयार व्हायची. मग आम्ही मोठ्या शिताफीने तिथल्या बर्‍याच पापड्यांच्या जागांची आदलाबदल करुन टाकायचो. यामुळे त्या वाळत घातलेल्या पापड्यांमधील काही पापड्या आमच्या पोटात गेल्या आहेत हे कधीच लक्षात यायचं नाही. या कामात आम्ही एक्स्पर्ट झालो होतो. 

वाळवाणाच काम म्हणजे सामूहिक कृती. सर्वानी मिळून करायचं काम. याला एक सांस्कृतिक अधिष्ठानदेखील आहे. घरात लग्न कार्याच्या आधी सांडगे घातले जातात. लग्नाचा मुहूर्त करताना सर्वात आधी सांडगे घालून मुहूर्ताला सुरुवात करतात. म्हणजे त्यानंतर लग्नाच्या तयारीला लागतात. याच बेगमीच्या पदार्थांबद्दल अनेक समज गैरसमज रूढ आहेत. लग्न घरात एकदा बनवलेले बेगमीचे  हे पदार्थ पुन्हा वर्षभर बनवले जात नाहीत. त्याच काळात बनवणं शुभ मानलं जातं.

महाराष्ट्र, गुजरात,  राजस्थानात उडिदाचा पापड बनवला जातो तर दक्षिण भारतात तांदळाचा. राजस्थानमध्ये ताटाच्या आकाराचा पापड असतो तर दक्षिण भारतात हातच्या आकाराचा पापड असतो. प्रमाण वेगळं असेल, आकार वेगळे असतील पण भारतभर वाळवणाचे पदार्थ अतिशय प्रिय आहेत.

आजही ग्रामीण भागात याकाळात  घरोघरी हे पदार्थ बनवले जातात. वाड्यात राहत होते तोवर हे सगळे पदार्थ प्रत्यक्ष बनताना बघायला मिळायचे. पण आता दुकानातून विकत आणून खाल्ले जाऊ लागलेत. कुरड्या बनवण्यासाठी केला जाणारा गव्हाचा चीक तर खूप वर्षात खाल्ला नाहीये.

पुढच्या पिढीपर्यंत या सगळ्या गोष्टी टिकून राहिल्या पाहिजेत. वाळवण म्हणलं की आठवतो आमचा वाडा, बालपणीचे मित्र-मैत्रिणी आणि आठवतं आमचं भलं मोठं अंगण. उन्हाळा कितीही नकोसा वाटला तरी या अशा 'चविष्ट' कारणांसाठी हवाहवासा वाटतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com