12 th Result 2024 : नापास कोण? मुलं की व्यवस्था?

12 th Result 2024 : आज अवतीभवतीची सारीच मूलं निशाचर झालेली दिसतात. रात्र-रात्र ही मूलं मोबाईलवरती किंवा कंप्युटरवरती काही बाही करत असतात.
12 th Result 2024
12 th Result 2024 Dainik Gomantak

संगीता नाइक

गोवा बोर्डाच्या बारावीच्या निकलाची यंदाची टक्केवारी गेल्या ९ वर्षात सर्वात कमी होती. २,६०० म्हणजे साधारणत: १५ % मुल यंदा बारावी नापास झाली. निकालाच विश्लेषण करताना बोर्डाचे चेअरमन भगीरथ शेट्ये यांनी इतर गोष्टींबरोबर मुलांच्या सततच्या सोशल मीडिया, इंटरनेट, मोबाईल आदींच्या अती वापरावरही बोट ठेवलं.

तंत्रज्ञानाच्या अती आणि अयोग्य वापरामुळं मुल अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं होत. राज्याच्या शिक्षण क्षेत्राशी अतिशय जवळून निगडित असलेल्या या अधिकाऱ्याच वक्तव्य प्रसारमाध्यमांच्या हेडलाईन पुरत मर्यादित राहता कामा नये.

हा खरतर शिक्षक, पालक, शिक्षण व्यवस्था, किंबहुना एकूण समाजासाठीच ''वेकअप कॉल'' आहे - हे सांगण्यासाठीचा कि वेळीच योग्य उपाययोजना केली गेली नाही तर पुढच्या पिढीचे आम्ही गुन्हेगार ठरू.

या अनुषंगाने मला दोन महत्वाच्या गोष्टीं बद्दल बोलायचंय, एक आमची शिक्षण व्यवस्था आणि दुसरी तंत्रज्ञानाचा वापर.

लक्षात घ्या, नुकतंच भावविश्व फुलू लागलेल्या २,६०० तरुण तरुणींवर आम्ही नापास म्हणून शिक्का मारून मोकळे झालो आहोत. कुणीतरी कधीतरी सांगितलेली एक बोधकथा आठवली. एकदा म्हणे प्राण्यांमध्ये सर्वोत्तम कोण हे ठरवण्यासाठी जमिनीवर धावण्याची शर्यत लावली गेली. उपजत धावण्याचं कौशल्य असलेले वाघ, ससा आदी प्राणी सरस ठरले, झाडावरून लीलया उड्या मारणाऱ्या माकडाला पळता येत नाही म्हणून अपयशी तर धावायचं सोडाच पण जमिनीवर आल्याबरोबर श्वासही न घेऊ शकणाऱ्या माशाला नापास घोषित केलं गेलं.

आपल्या शर्यत केंद्रीत शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण तरी यापेक्षा काय वेगळे करतो? वेगवेगळ्या क्षमतेच्या, वेगवेगळी गुण वैशिष्ट्य अंगी असलेल्या विद्यार्थी समुदायाच यश -अपयश एकाच मोजपट्टीवर मोजायचा प्रयत्न करतो. वाईट गोष्ट ही की त्यानुसार त्यांच्यावर यशवंत, उत्तम, सर्वोत्तम, नापास, अपयशी, हळू, असक्षम अशे अनेक ठप्पे हि मारून मोकळे होतो. हा व्यवस्थेन मारलेला स्टॅम्प हीच आपली क्षमता असं समजून ही मूल मोठी होतात.

प्रस्थापित व्यवस्थेला पारख न करता येण्याजोगी गुणवत्ता असूनही, स्वतःची या स्टॅम्प परती वेगळी ओळख असू शकते हे लक्षात न आल्याने आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता असलेली ही मूल आत्मविश्वास गमावून आयुष्याला समोर जातात. नव्या शैक्षणिक धोरणात या गोष्टींबद्दल काही प्रमाणात उपाययोजना केल्याचं जाणवत.

पण ह्या धोरणाची खरी कसोटी त्याच्या योग्य अमलबजावणीवरच ठरेल. जुनीच मानसिकता घेऊन नवं शैक्षणिक धोरण राबवण्याचा प्रयत्न झाला तर मात्र आमची ना घरका ना घाट का अशी अवस्था होईल. याबद्दलची जागरूकता शिक्षण व्यवस्थेतील सर्वच घटकानी दाखवली तरच अपेक्षित बदल होण्याची थोडीतरी शक्यता आहे.

आता वळूया तंत्रज्ञानाकडे. तंत्रज्ञान हा आजच्या पिढीच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कोशल्य किंबहुना हर एक प्रकारच्या संधी समानपणे जगभरातील सर्वांसाठी - भाषा, प्रांत, देश आदींची बंधने लांघून तंत्रज्ञान उपलब्ध करून देत. त्यामुळं, काहीही झालं तरी मुलांना तंत्रज्ञानापासून तोडणं हा उपाय होऊच शकत नाही. किंबहुना तस करणं म्हणजे त्याना उचित संधी मिळण्यापासून वंचित करणं होय. म्हणूनच व्यवस्थेकडून हस्तक्षेप अपेक्षित आहे तो यासंबंधी योग्य ती दिशा आणि जागरूकता देण्या संबंधीचा.

आज अवतीभवतीची सारीच मूल निशाचर झालेली दिसतात. रात्र- रात्र ही मूल मोबाईलवर किंवा कंप्युटरवर काही बाही करत असतात. शहर असो की गाव हे समीकरण आजकालच्या सर्वच मुलांना लागू होत. ह्यातली काही अभ्यासात व्यग्र असतात, काही गेम मध्ये तर बहुतेक इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया वर वा व्हाट्सअँप सारख्या चॅटिंग अ‍ॅप्स वर.

पालक जेंव्हा मुलांना कोणत्याही प्रकारचे गॅझेट- मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब इत्यादी उपलब्ध करून देतात तेंव्हा न चुकता त्या उपकरणाच्या बऱ्या वाईट परिणामांची जाणीव मुलांना करून दिली गेली पाहिजे. शाळांनीही वेळोवेळी सर्वच वयाच्या मुलांसाठी अशी जागरूकते संबंधीची सत्रे आयोजित करायला हवीत.

विषयाचे गांभीर्य लक्षात घेता दर टर्मला अशी तीन ते चार तरी सत्र आयोजित करण्यावर भर द्यायला हवा. मुलाना गुंतवून ठेवणाऱ्या सोशल मीडिया, गेम्स, चॅट्स आदी मागच्या संकल्पनांची, बऱ्या वाईट परिणामांची जाणीव करून द्यावी.

तंत्रज्ञान संबंधी वेगवेगळे प्रयोग करणारा ह्या क्षेत्रातील अनभिक्षित बादशहा आणि टेस्ला ह्या कंपनीचा मालक इलॉन मस्क म्हणतो तस आजच्या मुलांना शिक्षणाचं आकर्षण वाटावं असं वाटत असेल तर ते त्यांना आवडणाऱ्या आणि रुचणाऱ्या पद्धतीनं दिल गेलं पाहिजे. मस्क म्हणतात ''Education should be as close to a good video game as possible! त्यांना आपलस, सवकळीच वाटणाऱ्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर मुलांच्या सर्वांगीण विकासात महत्वाचा वाटा उचलू शकतो.

पण त्यासाठी गरज आहे ती त्यांची भरकटत चाललेली प्रज्ञा योग्य दिशेने वळवण्याची. आजच्या घडीस एआय द्वारे शिकण्या शिकवण्याच्या हजारो संधी उपलब्ध आहेत. एक खान अकाडमी या संस्थेद्वारेच सर्वच विषय मुलं आवडीनं शिकतील अशा फॉरमॅट मध्ये कितीतरी शैक्षणिक सामुग्री उपलब्ध करून दिलीय.

त्यांचा एआय युक्त खानमिगो वापरून मूल स्वतःच्या गतीनं सर्व विषय समजून घेऊन शिक्षण घेऊ शकतात. अगदी सहज वापरता येण्याजोगा ChatGPT वापरून, गणितासकट कितीतरी क्लिष्ट विषय मुलांसाठी सोपे केले जाऊ शकतात.

मुलांना हि टूल्स वापरायचं प्राथमिक प्रशिक्षण दिल तर मूल कल्पकतेनं ती वापरतात. प्रत्यक्षात शिक्षकांना किंवा पालकांना प्रश्न किंवा अडचणी न विचरणारी मुलहि ChatGPT कडे मनमोकळेपणाने मदत मागून मजेमजेत विषय समजून घेताना मी पहिलीयत.

12 th Result 2024
Goa College Admission Process: राज्यातील महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया १० मेपासून; गुणवत्ता यादीनुसार प्रवेश

सर्वच विषयातील माहिती ChatGPT सहज उपलब्ध करते तसंच त्याविषयीच्या सर्व प्रश्नांची उत्तरही समर्पकपणे देते. कितीही वेळा, परत परत विचारलं तरीही न कंटाळता समजावून सांगते. गणिता सारख्या विषयात ह्याचा खूप फायदा होऊ शकतो.

अशी टूल्स, तंत्रज्ञानामुळं सहज उपलब्ध झालेल्या अभिनव शिक्षण पद्धती यांचा वापर मुलांना विषयांच्या गाभ्यापर्यंत नेण्यास शिक्षण संस्थांनी वापरायला सुरवात केली तर नापास हा शब्दच इतिहासजमा होईल ह्याची मला पक्की खात्री आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com