'न भुतो न भविष्यती' आसामने दिला जगाला कवितेतून संदेश!

एकूण तीन दिवस चाललेल्या ह्या साहित्योत्सवात देशातील 130 भाषांतील कवितांचे सादरीकरण झाले. त्यात आसामी, हिंदी, मराठी, कोंकणी, कन्नड, मल्याळम, बोडो, तमीळ, बंगाली, उडिया या प्रमुख भाषांतील कवींबरोबरच भारतातल्या अनेक बोलीभाशांतील कवींना खास आमंत्रित करण्यात आले होते.
Assam
AssamDainik Gomantak

बोडो भाषेत कन्थाय म्हणजे कविता. थुनलाइयारी फोरबो म्हणजे साहित्योत्सव. आसाम (Assam) मधल्या बोडोलँड सरकारने अगदी अलीकडेच न भुतो न भविष्यती या प्रकारात मोडणारा 'कोक्राझार साहित्योत्सव' गौरांग नदीच्या काठावर घडवून आणला. एकूण तीन दिवस चाललेल्या ह्या साहित्योत्सवात देशातील (India) 130 भाषांतील कवितांचे सादरीकरण झाले. त्यात आसामी, हिंदी, मराठी, कोंकणी, कन्नड, मल्याळम, बोडो, तमीळ, बंगाली, उडिया या प्रमुख भाषांतील कवींबरोबरच भारतातल्या अनेक बोलीभाशांतील कवींना खास आमंत्रित करण्यात आले होते. लिंबू, न्यासी, खासी, कोच राजबंशी, गालो, शेरडुकपेन, तांगसा, टोटो, तिवा, मगाही, गारो, रियांग, गोलपारीया, कारबी, मांगर, हाखून, सियांग, अपातानी, तमांग, कचारी, झोमी, देवरी, मिसींग, राय, लेपचा, आहोम, चकमा, कोडवा, बर्मन या सारख्या अनेक बोलीभाशांतील कवींना ऐकण्याचा सुयोग प्रेक्षकांना आला.

Assam
Assam: छठ पूजेवरुन परतत असताना करीमगंजमध्ये भीषण अपघात 9 जणांचा मृत्यू

कोक्राझार साहित्योत्सवाची थीम होती- ‘पोएट्री फॉर पीस अॅण्ड लव्ह’. बोडोलँड हा भारतातील एक अशांत प्रदेश! कित्येक वर्षें या प्रदेशाने आतंकवाद सहन केला. ज्या हाताने बंदूक उचलली तेच हात आज बोडोलँडमध्ये सशक्त आणि सर्जनशील साहित्य निर्माण करताहेत याचा प्रत्यय कोक्राझार साहित्योत्सवात आला. लोकनृत्य, लोकसंगीत (Folk music) आणि कवित्व हे बोडो माणसाच्या रक्तातच आहे. आसाममधील सरकारात आज बोडोलँडमधील कित्येक कवी, लेखक आमदार म्हणून निवडून आलेत. त्यांना प्रेम आणि शांतीच्या नावाने बोडोलँडचा विकास व्हावा असे प्रामाणिकपणे वाटते आहे. बोडोलँड ट्रायबल कांऊंलसीलचे प्रमुख श्री प्रमोद बोडो यांनी साहित्योत्सवाच्या आरंभालाच आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, 'आजचा बोडोलँड फार वेगळा आहे आणि तो शांतीच्या मार्गाने वाटचाल करीत आहे. आम्हाला हा प्रदेश प्रेम आणि शांतीच्या मार्गाने विकसित करायचा आहे. कवितेतून हा संदेश जगभरातील नागरीकांपर्येंत पोचवायचा उद्देश या साहित्योत्सवाच्या मागे आहे'.

तीन दिवस अखंड चाललेल्या या कोक्राझार साहित्योत्सवात मंद संगीताच्या धुनीवर कवितांचे अनोखे सादरीकरण झाले. त्यात भारतातील अनेक नामवंत कवींनी आपल्या कविता सादर केल्या. जेष्ठ उर्दू कवी जयंत परमार, हिंदी कवी डॉ सुधीर सक्सेना, अासामी कवी बिजोय शंकर बर्मन, कोकबोरोक कवी चंद्रकांत मुरासिंग, सिंधी कवी हरीश करमचंदानी, कोंकणी कवी परेश नरेंद्र कामत, हिंदी कवी जितेंद्र श्रीवास्तव, राजस्थानी कवी मीठेश निर्मोही, मैथिली कवी पंकज कुमार, उडिया कवी सुजीत पांडा, अवधी कवी बोधिसत्व, गुजराती कवी श्री ध्वनील पारेख, हिंदी कवी नितीन सोनी या कवींनी साहित्योत्सवात लक्षवेधक कविता सादर केल्या. ‘पोएट्री फॉर पीस अॅण्ड लव्ह'ची संकल्पना घेऊन अगदी अनोख्या रूपांत बोडो सांस्कृतीक परिसरांत एक अविस्मरणीय आणि ऐतिहासीक साहित्योत्सव संपन्न झाला. या साहित्योत्सवात गोव्याचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी कामत यांनीही आपली कोंकणी तसेच अन्य कोंकणी कवितांचे अनुवाद सादर करून गोव्याचा संपन्न सहभाग नोंदवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com