भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोतील सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यशस्वीला अर्धशतक पूर्ण करता आले नाही; मात्र त्याच्या विकेटनंतर झालेल्या या घटनेमुळे सामन्याचे वातावरण काही काळ चांगलेच तापले. दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर धक्काबुक्कीही झाली. अखेर श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा आणि इतर खेळाडूंनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी डावाची सुरुवात करताना पहिल्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. मात्र, राहुलला लाहिरू कुमारा याने बाद केल्यानंतर भारताला दुसरा धक्का बसला.
यशस्वीने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचा सुरेख मेळ साधत 53 चेंडूंमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. अर्धशतकापासून अवघ्या पाच धावा दूर असताना त्याचा डाव संपला. असिथा फर्नांडोच्या 17व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर यशस्वीने बॅकफुटवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडूला अपेक्षित दिशा मिळाली नाही आणि आतील कडा घेत तो थेट स्टंपवर जाऊन आदळला.
यशस्वीला बाद केल्यानंतर असिथा फर्नांडोने आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन केले. याचदरम्यान त्याने यशस्वीला काहीतरी म्हटल्याचे दिसून आले. यामुळे पॅव्हेलियनच्या दिशेने जात असलेला यशस्वी पुन्हा मागे वळला.
गॉलमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी आणि निरोशन डिकवेला यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाची पार्श्वभूमीही या घटनेला असल्याचे सांगितले जात आहे. यशस्वी आणि असिथा यांच्यात काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे दिसले.
वाद वाढत असताना यशस्वीचे हेल्मेट असिथाच्या कपाळाला लागल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना दूर करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती आणखी चिघळण्यापूर्वी श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा पुढे आला. श्रीलंकेच्या इतर खेळाडूंनीही असिथाला बाजूला घेतले, तर यशस्वीला भारतीय खेळाडूंनी शांत केले.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सामन्यातील या प्रकाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) दखल घेतली जाते का आणि दोन्ही खेळाडूंवर काही शिस्तभंगाची कारवाई होते का, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
यशस्वी आणि राहुल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली असली तरी दोन्ही सलामीवीर लवकर माघारी परतले. राहुलला 11व्या षटकात लाहिरू कुमारा याने निरोशन डिकवेलाच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर यशस्वीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
यशस्वीने लाहिरू कुमारा यांच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार लगावले. तसेच प्रभात जयसूर्याच्या चेंडूवर शानदार कव्हर ड्राइव्ह खेळत आपली आक्रमक शैली दाखवली. मात्र, अखेर 45 धावांवर त्याला माघारी जावे लागले.
लंच ब्रेकपर्यंत भारताने दोन विकेट गमावत 88 धावा केल्या होत्या. देवदत्त पडिक्कल 13 धावांवर, तर कर्णधार शुभमन गिल 11 धावांवर खेळत होते. पडिक्कलला सुरुवातीलाच जीवदान मिळाले. धनंजय डी सिल्वाने केशरा नुवानथा यांच्या गोलंदाजीवर त्याचा झेल सोडला.
भारताने मालिकेतील पहिला सामना तब्बल 165 धावांनी जिंकत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे श्रीलंकेसाठी दुसरी कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातच पहिल्याच दिवशी यशस्वी आणि असिथा यांच्यात झालेल्या वादामुळे सामन्याची रंगत आणखी वाढली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.