पणजी: चिंबल येथील प्रस्तावित मॉलमुळे नागरी वस्ती वा जलाशयाला कोणताही धोका पोहोचणार नाही, अशी ग्वाही मंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत दिली. मॉल प्रकल्पासाठी जे पाणी लागणार आहे, त्यासाठी तेथील तलाव किंवा अन्य कोणत्याही स्थानिक जलाशयाचे पाणी वापरले जाणार नाही. पाणीपुरवठा विभागाकडून प्रकल्पास लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण केली जाईल, असे सुस्पष्ट आश्वासनही खंवटे यांनी दिले.
प्रस्तावित मॉलला विरोध करणारे लोक आता साखळी उपोषणास बसले आहेत. तथापि, या लोकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार केला आहे का, असा प्रश्नही खंवटे यांनी उपस्थित करताना ते म्हणाले की, सरकार रोजगार पुरवू शकत नसल्याचा आरोपही हेच लोक करतात.
युनिटी मॉलशेजारी इतर खासगी वसाहत प्रकल्प आल्यावेळी आता सरकारच्या प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांना तेथे तोयार तलाव असल्याची जाणीव नव्हती का, असा सवालही खंवटे यांनी केला. तोयार तलावाचे प्रभाव क्षेत्र हे २५० मीटर असून हा प्रकल्प त्या निर्धारित मर्यादेबाहेर असल्याचेही स्पष्टीकरण खंवटे यांनी दिले.
प्रस्तावित मॉलपेक्षाही सरकारला मुलांच्या भवितव्याची अधिक चिंता असल्याची माहिती देताना खंवटे यांनी सांगितले की, सांताक्रुझमधील अनेकांना हा प्रकल्प झालेला हवा आहे. ते मला सांगतात, की आमच्या मुलांसाठी तो प्रकल्प हवा आहे. उद्या ते लोकही रस्त्यावर येतील. केंद्राचा हा प्रकल्प पर्यटन आणि सांताक्रुझच्या लोकांसाठी हिताचा असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले.
ओलित क्षेत्राच्या संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध असून पर्यावरणीय आणि आवश्यक ते सर्व नियम पाळले जातील, असे आश्वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिले. हा प्रकल्प प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गालगत असला तरी महामार्ग रुंदीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी प्रस्तावित मार्ग रुंदीकरण व घरांविषयी असलेल्या धोक्याबाबत उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.