वन्यजीव तज्ञांनी बिबट्या आणि वाघांच्या पशुधनावरील हल्ल्यांना रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या महिनाभरात सत्तरी आणि धारबांदोडा येथील म्हादई खोऱ्यात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिकार उपलब्ध नसल्याने अशा घटनामध्ये वाढ होत असल्याचे वन्यजीव तज्ञांनी म्हटले आहे.
वन्यजीव जीवशास्त्रज्ञ ए जे टी जॉनसिंग यांनी राज्याच्या वन विभागाला एक अहवाल सादर केला. वाघांना जंगलात परत आणण्यासाठी वन क्षेत्रात सांबरांची संख्या वाढवणे यासारख्या उपाययोजना जॉनसिंग यांनी सुचवल्या आहेत. या दिशेने कोणतेही प्रामाणिक प्रयत्न झाले नाहीत, त्यामुळे बिबट्या आणि वाघ पाळीव प्राण्यांवर हल्ले करताहेत. असे जॉनसिंग यांनी म्हटले आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला सत्तरी येथील सुर्ला येथील देव पिंगळे यांच्या म्हशीवर वाघाने हल्ला केला होता. दरम्यान, म्हशीचा पंचनामा आणि पोस्टमॉर्टम तपासणी केली आहे. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर आवश्यक नुकसान भरपाई आणि मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अशी माहिती म्हादई वन्यजीव अभयारण्याचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर गिरीश बैलुडकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.
तांबडी सुर्ला, धारबांदोडा येथील धारगे येथे पंधरवड्यापूर्वी दशरथ ऐत्रेकर यांच्या म्हशीवर वाघाने हल्ला केला होता. मात्र, वन्यजीव विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या घटनेची दखल घेतली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
'नैसर्गिक अधिवासात अन्न नसल्यामुळे अशा घटना घडत अल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच गोव्याच्या म्हादई भागातील जंगलात कमी होत चाललेल्या हरणांच्या विविध प्रजातींची संख्या वाढवण्याची गरज आहे.' असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.