पणजी, कोकणी चळवळ ही गोवा घडविण्याची चळवळ होती, परंतु गोवा घटकराज्य झाल्यानंतर ती कुठे तरी कमी पडत आहे.
गोव्यासाठी अस्मिता महत्त्वाची असून गोवा घडविण्याची प्रक्रिया अजून संपलेली नाही हे लक्षात घेऊन साहित्यिक, विचारवंतांनी कार्यरत असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले.
पाटो येथील संस्कृती भवनच्या बहुउद्देशीय सभागृहात बिम्ब प्रकाशनाद्वारे आयोजित बिम्ब कर्तृत्त्वोत्सव सोहळ्यात आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ लेखिका शीला कोळंबकर, हेमा नायक, दिलीप बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नायक पुढे म्हणाले की, कोकणी चळवळीतील महिलांच्या योगदानाबाबत तसेच समकालीन इतिहासावर इतक्या संक्षिप्तपणे कोणी लिहिले नाही. श्रद्धा गरड यांनी अतिशय चोखंदळपणे उत्कृष्ट लेखन केले आहे. अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण ग्रंथ चिरंतन बनतात, असे ते म्हणाले.
बिम्बने व्यासपीठ दिले
लिहिण्याचे, बोलण्याचे कौशल्य असले म्हणून होत नाही, ते प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठाचीही गरज असते. बिम्ब प्रकाशनाने ते व्यासपीठ मला मिळवून दिले, त्यामुळे मी या मुलाखती घेऊन त्या प्रकाशित करू शकले. यापैकी कुठल्याच अस्तुरीने मला नकार दर्शविला नाही हे त्यांचे मोठेपण असल्याचे श्रद्धा गरड
यांनी सांगितले.
कोकणी चळवळीत महिलांचे योगदान : गरड
कोकणी चळवळीत महिलांचे योगदान आहे, परंतु त्यांची कुठेही नोंद मिळत नव्हती. त्यामुळे मला नेहमी प्रश्न पडायचा की, त्यांच्याबाबत कोणीच कसे काही लिहिले नाही? त्यामुळे अनेकांच्या मुलाखती घेऊन महिलांच्या चळवळीतील कार्याबाबत तसेच त्यांच्या सर्व क्षेत्रातील योगदानाबाबत लिहिण्याचे ठरविले. या पुस्तकात एकूण १९ अस्तुरींबाबत लिहिण्यात आले असल्याचे श्रद्धा गरड यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.