डिचोली: प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनदेखील मुळगावहून दोडामार्गच्या दिशेने जाणाऱ्या बगलमार्गाला लागलेले कचऱ्याचे ग्रहण काही सुटता सुटत नाही.
कचरा टाकण्याचे प्रकार बंद व्हावेत म्हणून बगलमार्गावर लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यासह जाळीही गायब झाल्याने पंचायतीचा हा प्रयोगही अयशस्वी ठरला आहे. परिणामी मुळगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या या बगलमार्गावर पुन्हा एकदा कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून, ती दिवसेंदिवस भयानक बनत चालली आहे.
बगलमार्गावरील कचऱ्याच्या समस्येवर नियंत्रण यावे, यासाठी पंचायतीतर्फे दोन महिन्यांपूर्वी बगलमार्गाच्या बाजूने ‘ब्लॅक स्पॉट’ ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरा लावला होता. मात्र, तो कॅमेरा गायब झाला. त्याठिकाणी जाळी लावली होती.
त्यामुळे काही दिवस कचरा टाकण्याचे प्रकार बंद झाले होते. मात्र, काही दिवसांनी जाळीही गायब झाली. आता तर कचरा टाकण्यासाठी कचराफेकूंना रान मोकळे झाले आहे. या प्रकारामुळे पंचायत पुरती हतबल झाली आहे. कचरामुक्तीसाठी जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन पंचायतीतर्फे करण्यात येत आहे.
काही भागात विदारक चित्र
मुळगाव पंचायतीतर्फे दारोदारी कचऱ्याची उचल करण्यात येत आहे. अधूनमधून स्वच्छता मोहीमही राबविली जाते. तरीदेखील काही ठराविक भागात कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. मुळगाव-दोडामार्ग रस्त्यावर तर कचऱ्याची समस्या गंभीर आहे. मुळगाव जंक्शन ते श्री नागदेवता मंदिर दरम्यानच्या बगलमार्गाच्या बाजूने सुका आणि ओला कचरा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. या कचऱ्यामुळे बगलमार्गावर सध्या विदारक चित्र दिसून येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.