मोरजी: मोरजी, मांद्रे, हरमल या समुद्रकिनारी भागात पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात शॅक आणि रेस्टॉरंट व्यावसायिक १५ मीटर अंतराबाहेर लाकडी पलंग, खुर्च्या, टेबल घालून अतिक्रमण करतात. त्यामुळे पर्यटकांना मोकळेपणाने किनाऱ्यावर फिरता येत नाही. यासंदर्भात मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना विचारले असता, जे कोणी अतिक्रमण करतात, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले.
मागील महिन्यात हरमल समुद्रकिनारी अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात लाकडी पलंग, खुर्च्या, टेबल घालून अतिक्रमण केले होते. एक स्थानिक युवक तेथून चालत निघाला असता त्याच्या पायाला खुर्ची लागल्यामुळे त्याने ती हलवली. त्यावेळी बिगर गोमंतकीय व्यावसायिकाने त्याला जबर मारहाण केली. त्यात त्या युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी किनाऱ्यावरील अतिक्रमण त्वरित हटवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
सरकार पर्यटन हंगामात स्थानिक युवकांना शॅक व्यवसायासाठी परवाने देते. १५ मीटरच्या आत १० जोड्या अर्थात २० लाकडी पलंग घालण्यासाठी त्यांना मुभा दिली जाते. लाकडी टेबल-खुर्च्याही १५ मीटरच्या आतच ठेवण्यास परवानगी असते.
मात्र, मोरजी, हरमल, आश्वे, मांद्रे या किनाऱ्यांवर समुद्राचे पाणी येते, तेथपर्यंत हे व्यावसायिक लाकडी पलंग, खुर्च्या, टेबल घालून अतिक्रमण करतात. त्यामुळे किनाऱ्यावर फेरफटका मारणारे पर्यटक तसेच नागरिकांना याचा बराच त्रास होतो. यावर आता सरकारने अंकुश ठेवण्याची गरज आहे.
पर्यटनमंत्र्यांनी तशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. किनारी भागात जे कोणी लाकडी पलंग, टेबल, खुर्च्या घालून अतिक्रमण करतात, त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. हा प्रकार रोखण्यासाठी केवळ सरकारनेच नव्हे, तर स्थानिक पंचायती, नागरिक, व्यावसायिक यांनीही लक्ष घालून जे कोणी अतिक्रमण करतात, त्यांना समजावून सांगावे. नंतर कारवाई करावी, अशी सूचना मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.