पणजी: सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. आणखी तीन दिवस पाऊस कायम राहणार असल्याने उरले सुरले पीकही हातचे जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात १२३.३९ इंचांची नोंद केलेला मान्सूनचा पाऊस गोव्यातून परतल्याची घोषणा हवामान विभागाने केली होती. त्यामुळे दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत गोमंतकीय जनता असतानाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याच्या प्रभावामुळे राज्यात तुरळक स्वरुपाच्या पावसास सुरुवात झाली.
शनिवारी मध्यरात्रीपासून राज्यभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्याचा मोठा फटका वाहन चालक आणि स्थानिकांना सहन करावा लागला. पावसामुळे डिचोली, सत्तरीत पडझडीच्या घटनांची नोंद झाली. पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ कायम ठेवल्याने आणि चक्रीवादळ उग्र रुप धारण करीत असल्यामुळे इतर राज्यांप्रमाणे गोव्यातील पावसातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अस्मानी संकटामुळे दरवर्षी गलितगात्र होणारा शेतकरी यंदाही पावसामुळे हैराण झालेला आहे. दिवाळीचा सण संपताच भात कापणीला सुरुवात करण्याच्या तयारीत तो असतानाच मुसळधार पावसाने राज्यभर हजेरी लावल्याने भाताचे पीक आडवे झाले.
त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे. पावसामुळे नष्ट झालेल्या भात पिकाचा सोमवारपासून पंचनामा करण्याचे कृषी खात्याने ठरवले होते. परंतु, पाऊस तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज असल्याने पंचनाम्यास उशीर होण्याची शक्यता आहे.
तब्बल सोळा वर्षांनी पंचवाडी-शिरोडा येथील म्हैसाळ धरण या वर्षी दुसऱ्यांदा भरून वाहू लागले आहे. २००९ मध्ये असेच हे धरण एकाच पावसाळ्यात दुसऱ्यांदा भरून वाहू लागले होते. यंदा मान्सून सरल्यानंतरही ऑक्टोबर महिन्यात म्हैसाळ धरण तुडुंब भरले आहे. या पावसाळ्यात गेल्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे धरणे पूर्ण भरून वाहू लागले होते. पंचवाडी शिरोड्याला पाणी पुरवठा करणारे हे धरण यंदा मान्सून नंतर पावसाने जोर धरल्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.