पणजी: मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे उद्या ३१ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात मराठीप्रेमी कार्यकर्ते एकत्र येऊन ते मराठीला राजभाषेचा मान मिळवून देण्याचा निर्धार करतील, असे समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
वेलिंगकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व भागांतून कार्यकर्ते या मेळाव्यास येणार आहेत. त्यामुळे मराठीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गोव्यातील मराठी संस्कृती टिकवण्यासाठी जनता मोठ्या संख्येने प्रतिसाद देत असून मराठीवरील कोणत्याही प्रकारे अन्याय सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले आहे.
अभिजात मराठी भाषा गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे ही मराठीप्रेमींची मुख्य मागणी आहे. सर्व भारतीय भाषांवर प्रेम करणारे नागरिक कोकणीला विरोध करीत नसून मराठीला राजभाषेचा बहुमान मिळावा, अशी मागणी करीत असल्याचे प्रा. वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्यास वेलिंगकर यांच्यासह गोपाळ ढवळीकर, गुरुदास सावळ, प्रदीप घाडी, नेहा उपाध्ये, गजानन मांद्रेकर, सागर जावडेकर, अनुजा जोशी, पौर्णिमा केरकर, प्रकाश भगत, नितीन ढवळीकर यांची उपस्थिती राहणार आहे.
गेली पंधरा दिवसांपासून या मेळाव्याचे नियोजन केले जात आहे. मराठी राजभाषा व्हावी यासाठी १९८५ पासून प्रयत्न झाले. अनेक मराठीप्रेमींनी विविध व्यासपीठावरून मराठी राजभाषा व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला. परंतु मराठीचा राजभाषा म्हणून स्वीकार सरकारने केला नाही. कोकणी ही राजभाषा झाली, पण मराठीप्रेमींनी त्या भाषेला विरोध न करता मराठी राजभाषा कशी होईल, यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी मराठीप्रेमींना साद घातली आहे.
मराठी भाषेतील अनेक लेखक, साहित्यिक, विचारवंत, अभ्यासकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक वेलिंगकर यांनी केले आहे. राज्यात लेखक, कवी, साहित्यिकांची संख्या मोठी आहे, त्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून आपले मराठीवरील प्रेम व्यक्त करणे आवश्यक आहे. या मेळाव्याला मराठीवर प्रेम करणारे लोकच मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी आशा असल्याचे त्यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले.
इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या संस्थेच्या सभागृहाची बैठक व्यवस्था किमान ८०० लोकांची आहे. तरीही राज्यभरातून हजारांच्यावर लोक येतील, असे आयोजकांना आशा आहे. दूरवरून येणाऱ्या या लोकांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. कोणत्याही संस्थांसाठी किंवा मराठीप्रेंमीसांठी वाहनांची सोय करण्यात आलेली नाही, केवळ आवाहन केल्यानुसार हे मराठीप्रेमी आपली ये-जाण्याची सोय करून येतील, असे आयोजन समितीच्या सदस्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान केला आहे. गोव्यात मराठीप्रेमींची संख्या पाहता तिला राजभाषेचा दर्जा मिळवा, अशी मागणी होत राहिली. गेली ४० वर्षे ही मागणी होत राहिली आहे, परंतु राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारने ती मागणी मान्य केलेली नाही. शशिकांत नार्वेकर यांनी सुरवातीला मराठी राजभाषा व्हावी म्हणून चळवळ उभी केली. त्यानंतर ही चळवळ गो. रा. ढवळीकर यांनी पुढे चालू ठेवली. रमेश नाईक, प्रदीप घाडी आमोणकर यांनी चळवळीचे नेतृत्व करीत राजभाषेसाठीची मागणी उचलून धरली.
राज्यात मराठी राजभाषा व्हावी यासाठी अनेक संस्थांची मागणी आहे. पणजीतील मेळाव्यासाठी पेडण्यापासून ते काणकोणपर्यंतच्या संस्था आग्रही राहिल्या आहेत. अनेक संस्थांशी आयोजकांच्यावतीने चर्चा होत आहे. आत्तापर्यंत या मेळाव्यासाठी साहित्य संगम, मराठी राजभाषा प्रस्थापन समिती, सत्तरी मराठी अस्मिता, मराठी असे मायबोली, मराठी राजभाषा समिती या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थिती राहणार आहेत. त्याशिवाय अनेक संस्थांचे प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधून आहेत. प्रत्येक संस्थांचे प्रतिनिधी प्रातिनिधीक स्वरूपात उपस्थित राहतील, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील बहुतेक वर्तमानपत्रे, धार्मिक विधी, वाचन, लेखन आणि पत्रव्यवहार मराठी भाषेत केला जात आहे. परकीयांच्या जुलमी राजवटीतही या प्रदेशात मराठी शाळा सुरू होत्या. मराठीत शिक्षण घेतले जात होते. मग आत्ताच मुक्त गोव्यात मराठीची उपेक्षा का? असा सवाल वेलिंगकरांनी विचारला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.