पणजी: फेब्रुवारी २०१५ मध्ये १७ वर्षीय मुलगी आणि इस्सुब खान एकत्र मुंबईला निघून गेले होते. दोघांचे प्रेमसंबंध २०१३ पासून सुरू होते; मात्र मुलीच्या पालकांना या नात्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तीव्र विरोध केला. त्यानंतर या दोघांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
पळून गेल्याची तक्रार झाल्यावर मुंबईत पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि खानवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. याच आरोपातून तब्बल दहा वर्षांनी आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने इस्सुब खान (३०) याला अपहरणाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले. २०१५ साली दाखल झालेल्या या खटल्यात, अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा आरोप ठेवून त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते.
या शिक्षेविरुद्ध इस्सुबने अपील दाखल केले होते. न्या. श्रीराम शिरसाट यांनी पुरावे व साक्षींचा बारकाईने अभ्यास केला. मुलीच्या साक्षीमध्ये ती स्वतःच्या इच्छेने आरोपीसोबत गेल्याचे स्पष्टपणे नमूद होते. आरोपीने तिला प्रवृत्त केलेले नाही, उलट तिनेच फोन करून सोबत निघण्याचा निर्णय घेतला. ती अल्पवयीन असली तरी स्वतःच्या कृतीचे परिणाम समजून घेण्यास सक्षम होती, असे निरीक्षण नोंदविले.
सर्वोच्च न्यायालयाच्या एस. वरदराजन विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यातील महत्त्वाच्या निवाड्याचा दाखला देत उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, जोवर आरोपीकडून सक्ती, प्रवृत्ती किंवा फूस लावणे सिद्ध होत नाही तोवर अल्पवयीन मुलीने स्वतःहून आरोपीसोबत जाणे हे अपहरण ठरत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.