LLB Admission Scam : कारे कायदा महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून मुलाच्या प्रेमापोटी बीएएलएलबीच्या प्रवेशाच्या निकषांमध्ये बदल केले, या प्रकरणी विद्यापीठाने नेमलेली समिती चौकशी करीत आहे. परंतु विधी शाखेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी हा खेळ झाल्याने राज्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), भारतीय जनता युवा मोर्चा, गोवा फॉरवर्डचे युथ विंग गप्प आहेत.
पूर्वीसारख्या राज्यात विद्यार्थी चळवळ दिसत नाही, त्याला सध्या समाजव्यवस्था, शिक्षणातील व्यवसायीकरण किंवा संवेदनेचा अभाव अशी कारणे कारणीभूत असल्याचे दिसून येते.
एनएसयूआयने कारे कायदा महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणावर आवाज उठवला. परंतु त्यानंतर रस्त्यावर न उतरता विद्यापीठ प्रशासनाकडे चौकशीची मागणी करीत, कुलपतींना भेटणार असल्याची भूमिका घेतली.
त्याशिवाय या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला. महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही संघटना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यास आता धजावत नाही. संघटनांच्या काही प्रतिनिधींनी रस्त्यावर का उतरत नाही, यावर उत्तर देताना ‘गोमन्तकला’ सांगितले, सरकार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भीती आहे. त्याशिवाय हा आकस राजकीय हेतूने प्रेरित असतो, त्यामुळे विद्यार्थीही आंदोलनात उतरण्यास कचरतात.
एका विद्यार्थी संघटनेच्या नेत्याने मुलांवर गुन्हे दाखल होत असल्याने अलीकडे पोलिसांचा ताप नको, म्हणून संघटनेत येत नाहीत, असे सांगितले.
"आपण ज्या समाजव्यवस्थेत राहतो, त्याचे प्रतिबिंब दुसरीकडे उमटते. तशा पद्धतीने विद्यार्थी चळवळीचे झालेले आहे. पूर्वी विविध संघटना प्रबळ होत्या, त्यामुळे विद्यार्थी चळवळही सक्रिय दिसत.
नवे धोरण किंवा इतर शैक्षणिक प्रश्न असतील तर युवकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे असे विषय समजून घेतले तरच त्यातील चुका दाखविणारे किंवा बदल सुचविणारे, त्यासाठी लढणारे विद्यार्थी दिसू शकतात. शिक्षणातील व्यवसायिकीकरणामुळे सध्याचा विद्यार्थी रोजगार आणि नोकरीचा विचार करतो."
- युगांक नायक, सहायक प्राध्यापक.
"गोव्यात ८० च्या दशकात व्हायब्रंट फोर्स कार्यरत होत्या. विद्यार्थी संघटना प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत होत्या. आंदोलन तडीस नेण्यात त्यांचे कसब होते, परंतु आता विद्यार्थी मोबाईल आणि लॅपटॉपच्या दुनियेत गुरफटले आहेत. त्यामुळे विद्यार्थी चळवळ संपुष्टात आल्याचे दिसते. पूर्वी आंदोलन केल्यानंतर पोलिस केसेस होत होत्या. मात्र, त्यानंतर सरकार ते गुन्हे मागे घेत होते."
- ॲड. आयरिश रॉड्रिग्स.
"राज्यात बस तिकिटात ५० टक्के सवलत मिळावी म्हणून विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन झाले होते. गरीब घरातून त्यावेळी विद्यार्थी शिकण्यासाठी शहरात येत होते, चार आणेसुद्धा मिळणे अवघड होते. आपल्यावर अन्याय होत असल्याची जाणीव होताच विद्यार्थी आंदोलन करीत होते, त्यामुळे विद्यार्थी चळवळ आक्रमक दिसत होती.
त्यावेळी पोलिसांचा लाठीहल्लाही आमच्यावर झाला, गुन्हे दाखल झाले. राज्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने त्यावेळी दोन मंत्र्यांना घरीही जावे लागले होते. आज चळवळ चालविण्यासाठी जे नेतृत्व पाहिजे, तसे नेतृत्व नाही. देशपातळीवरसुद्धा विद्यार्थी चळवळीत मरगळ आलेली आहे, हे नक्की"
- प्रशांत नाईक, माजी नेते, विद्यार्थी चळवळ.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.