सत्तरी तालुक्यातील चोर्ला घाटातील दरड दरवर्षी कोसळत असून वाहतुकीचा खोळंबा नेहमीचाच बनलेला आहे. यंदाही पावसाच्या सुरुवातीला जून महिन्यात घाटमाथ्यावर दरड कोसळली होती. त्यावेळी तब्बल पाच तास वाहतूक बंद होती. घाटातील रस्त्यावर वाहनांची रांगच लागली होती. या घटना वार्षिक बनलेल्या आहेत. याची जाणीव असून देखील चोर्ला घाटात दरडी कोसळणार नाही यासाठी सरकार मात्र कायम स्वरुपी उपाय योजना हाती घेतलेली नाही. त्यामुळे चोर्ला घाटातील दरडी दुर्लक्षितच राहिलेल्या आहेत. त्यातून वाहतुकीला धोका वाढलेला असून ज्या ठिकाणी दरडी वारंवार कोसळत असतात त्याठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याची गरज आहे. गतवर्षी मुसळधार पावसाने चोर्लात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून सुमारे दहा पंधरा दिवस चोर्ला घाट वाहतुकीस बंदच होता. गतवर्षी अगदी घाटमाथ्यावर एका ठिकाणी एक दरड कोसळली होती. त्याठिकाणी जेसीबी यंत्रणेच्या मदतीने माती काढली जात होती. पण माती काढल्यावर पुन्हा माती दरडीची कोसळत होती. त्याठिकाणी काम हाती घेऊन सिमेंटने भिंत बांधण्यात आली. पण या परिसरात अनेक वळणाच्या ठिकाणी दरडी धोक्याच्या अजूनही आहेत. त्यातील एक यंदा कोसळली आहे. अनमोड घाट बंद असल्याने सर्वांना चोर्ला घाट परराज्यात जाण्यासाठी एकमेव शिल्लक असा घाट आहे. त्यामुळे रहदारी मोठी असते. सद्या कोरोनाच्या टाळेबंदीत कमी प्रमाणात वाहतूक सुरू आहे. पण भविष्याचा विचार करता या चोर्ला घाटातील दरडींचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याची नितांत गरज आहे. केरी सत्तरी तपासणी केंद्राकडून चोर्ला घाटाला सुरुवात झाल्यावर घाट संपेपर्यंत १८ किलोमीटरचा घाट मार्ग लागतो. या १८ किलोमीटरच्या मार्गात दरडी तसेच रस्त्यालगत झाडेही आहेत. तीही झाडे हटविण्याची जरुरी आहे. सरकारने या मातीच्या दरडी हटवून त्याठिकाणी उपाय योजना हाती घेतल्या पाहिजेत.