मोरजी: अवजड वाहतुकीमुळे हणखणे येथील तिळारी कालव्याला धोका निर्माण झाला आहे. मात्र या विरोधात जलस्रोत खाते कोणतीही कारवाई करत नसल्याने या निषेधार्थ हणखणे येथील श्री भराडी पाणी वाटप समितीतर्फे धारगळ येथील जलस्रोत खात्याच्या कार्यालयासमोर मंगळवारी (ता. १) एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ही वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.
हणखणे येथील तिळारीच्या मुख्य कालव्याच्या जोडरस्त्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. या भागात एक सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प असून या प्रकल्पाचे काँक्रिट मिक्सर वाहतूक करणारी अवजड वाहने तसेच खडी व अन्य साहित्य घेउन येणारी वाहनांमुळे या कालव्याला धोका निर्माण झाला असून कालव्याच्या काँक्रिटीला उभे तडे गेले आहेत.
याबाबत हणखणे येथील भराडी पाणी वाटप समितीने २९ ऑक्टोबर रोजी जलस्रोत विभागाला निवेदन सादर करून याकडे लक्ष वेधले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हणखणेत भेट देऊन पाहणी केली, मात्र कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
मंगळवारी होणाऱ्या धरणे आंदोलनासंदर्भात श्री भराडी पाणी वाटप समितीचे गोपाळ नाईक यांनी याबाबतचे निवेदन निवेदन अधीक्षक अभियंता शिरोडकर सादर केले आहे. अवजड वाहतुकीविरोधात जलस्त्रोत खात्याने योग्य कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.