पणजी: गोव्यात कोविडची स्थिती दिवसेंदिवस महाभयंकर होत चालली आहे. सर्व रुग्णालये त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना उपचार देत आहेत. खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांना जमिनीवर, स्ट्रेचर्सवर आणि खुर्च्यावर उपचार दिले जात आहेत. आताच ही परिस्थिती तर पुढे काय? गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरणांची व कबरींची तयारी करत आहेत काय असा प्रश्न गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी विचारला आहे. राज्यात आरोग्य क्षेत्रातील संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकमेकांवर राजकीय कुरघोडी काढण्यात व्यस्त आहेत. लोक त्रस्त असताना सरकार मात्र सुस्त आहे.
भाजप सरकारकडे स्थिती हाताळण्याची कोणतीही योजना नाही. अशा स्थितीत उपचाराची सुविधा उपलब्ध नसताना केवळ प्राण गमावण्याचा एकमेव पर्याय रुग्णांकडे आहे, असे चोडणकर म्हणाले. कोविडची दुसरी लाट येणार हे माहीत असूनही गेल्या एक वर्षात भाजप सरकारने खबरदारीची कोणतीच पाऊले उचलली नाहीत. कोविडचा संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना असंवेदनशील भाजप सरकारने हातात घेतल्या नाहीत. लोकांना चांगली आरोग्य सेवा द्यायला या सरकारला सपशेल अपयश आले आहे असे नमूद करून ते म्हणाले, गोमेकॉ, दक्षिण आणि उत्तर गोवा जिल्हा इस्पितळे, ईएसआय आणि इतर सर्व रुग्णालये त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक कार्यरत आहेत. खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा हीच परिस्थिती आहे.
कॉंग्रेसच्या कोविड नियंत्रण कक्षाला तर दर मिनिटास मदतीसाठी फोन येत आहेत. कोविड हाताळणी व व्यवस्थापन यासंबंधात जनतेला माहिती देण्यासाठी कोणतीही यंत्रणा सरकारकडे उपलब्ध नसल्याने लोकांना मदत करण्यासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत. आरोग्यमंत्र्यांनी काल आपल्या फेसबुक अकाउंटवरून येत्या दहा दिवसांत गोव्यात 200 ते 300 मृत्यू होतील असे जाहीर केले. नंतर त्यांनी हा पोस्ट काढून टाकला. आरोग्यमंत्र्यांनी वास्तविकता मांडली होती की लोकांना घाबरवण्याकरिता सदर पोस्ट टाकला होता हे लोकांना कळणे गरजेचे आहे. सदर पोस्ट काढून टाकण्यासाठी मोदी-शाह यांचा इशारा आला की गोव्याच्या सुपर मुख्यमंत्र्यांनी तो काढण्याचा आदेश दिला हे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.
गोव्यातील 13 दवाखाने बंद; साडेतीन लाख कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे वळणार
वैद्यकीय प्राणवायू, उपचार व औषधे न मिळाल्यामुळे कोविड रुग्णांचे मृत्यू होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “दिया जलाव, थाली बजाव, ताली बजाव” या उत्सवाची परिणती आता लोकांच्या मृत्यूने होत आहे, असे ते पुढे म्हणाले. राज्यात लोक कोविड संकटाचा सामना करत असताना, भाजप सरकार उत्सवी वातावरणात आहे व राजकीय लाभ घेण्यासाठी "टिका उत्सव" आयोजित करत आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.