केपे: दवर्ली येथील एका भाजी विक्रेत्या महिलेचे १२ लाखांचे दागिने लिफ्ट देेण्याच्या बहाण्याने युवतीने पळविले होते. ही गंभीर बाब असूनही केपे पोलिसांनी कुठलाही गुन्हा नोंदविला नाही. मात्र, ज्या महिलेचे दागिने चोरीला गेले होते, ते तिला परत केले. परंतु परत केलेल्या दागिन्यांमधील एक दागिना वितळविलेल्या स्थितीत होता, अशी धक्कादायक बाब पुढे आली असतानाही केपे पोलिसांना एफआयआर नोंद करावा असे का वाटले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या घटनेची माहिती अशी की, दवर्लीतील पिएदाद कुलासो (वय ६९ वर्षे) या महिलेने ८ ऑगस्ट २०२४ रोजी केपे पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ती मुलीच्या घराकडून आपल्या घरी जात असता हा प्रकार घडला. तिच्याकडे एक पिशवी हाेती. त्यात तिने दागिने ठेवले होते.
मडगावला जाण्यासाठी पाराेडा येथे बसची वाट पाहात उभी असताना केपेकडून आलेल्या एका युवतीने आपणही पाद्रीभाटच्या बाजूने जाते, असे सांगून तिला लिफ्ट दिली. यावेळी त्या महिलेची दागिन्यांची आणि इतर साहित्याची पिशवी त्या युवतीने स्कूटरच्या फूटरेस्टवर ठेवली होती.
सेंट जोजफ स्कूलकडे पोचल्यावर त्या युवतीने त्या महिलेला जवळच्याच दाेन घरांतून पिग्मी गोळा करायची आहे, असे सांगून पुढे रस्ता खराब असल्याने तुम्ही खाली उतरा आणि त्या घरापर्यंत चालत या, असे सांगून तिला खाली उतरविले आणि स्कूटरचे स्पीड वाढवून ती गायब झाली, असे कुलासोने तक्रारीत म्हटले होते.
ही तक्रार येऊनही पोलिसांनी एफआयआर नोंद केला नाही. आठ दिवसांनंतर म्हणजे १६ ऑगस्ट रोजी एका महिलेने हे दागिने त्या तक्रारदार महिलेला केपे पोलिस स्थानकात आणून दिले. मात्र, जे दागिने आणून दिले, त्यापैकी एक दागिना वितळविलेल्या स्थितीत होता, असे तक्रारदार महिलेच्या जबानीत म्हटले आहे. हे दागिने ते आणून देणाऱ्या त्या महिलेकडे चुकून राहिले. त्या पिशवीत सोन्याचे दागिने आहेत, याची तिला माहिती नव्हती, असा जबानीत आवर्जून उल्लेख केला आहे.
‘ती’ महिला कोण?
हे प्रकरण साधे वाटत असले तरी हा एकूण प्रकार पाहता लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ही दागिन्यांची पिशवी एक युवती घेऊन गेली होती. मग हे दागिने त्या महिलेकडे कसे काय आले? ज्या महिलेने हे दागिने पोलिस ठाण्यात आणून परत केले, त्या महिलेच्या नावाचा पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या जबानीत का उल्लेख केला नाही?
दागिना कुणी वितळविला?
कुलासो यांनी ८ ऑगस्ट २०२४ रोजी जी तक्रार दिली, त्यात एक दागिना वितळविलेल्या स्थितीत होता, असा उल्लेख नाही. मग तिला दागिने परत करताना हा एक दागिना वितळविलेल्या स्थितीत कसा सापडला, तो दागिना कुठे नेऊन वितळविला, याची चौकशी करावी, असे केपेच्या पोलिसांना का वाटले नाही? साहाय्यक पाेलिसांनी चूक करूनही निरीक्षकाने त्याकडे कसे दुर्लक्ष केले, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
फौजदारी आचारसंहितेप्रमाणे जर गंभीर गुन्हा झाल्याचे आढळल्यास त्या प्रकरणात एफआयआर नोंद करणे पोलिसांना बंधनकारक असते. तक्रारदाराने एफआयआर नोंद करायची नाही, असे म्हटले तरी गंभीरता लक्षात घेऊन अशा प्रकरणी चौकशी करणे आवश्यक असते. केपेतील हे प्रकरण त्याच प्रकारात मोडणारे आहे. - ॲड. प्रसाद नाईक, अध्यक्ष, दक्षिण गोवा वकील संघटना.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.