पणजी: राज्यात वाढत्या घटस्फोटांवर नियंत्रण आणण्यासाठी विवाह ठरलेल्या दोघांचेही विवाहाआधीच समुपदेशन करण्याचा विचार सरकार करत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सभागृहात सांगितले.
दै. ‘गोमन्तक’मध्ये १६ जून २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या वाढत्या घटस्फोटांवर आधारित अग्रलेखाचा संदर्भ देत आमदार उल्हास तुयेकर यांनी, राज्यात घटस्फोटांचे प्रमाण वाढत चालले आहे पण न्यायालयांत अशा प्रकरणांवर वेगाने सुनावण्या होत नाहीत, असे सांगितले. त्याचा फटका घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या दाम्पत्याला बसतोय. त्या काळात त्यांच्यासमोर इतरही कायदेशीर बाबी उभ्या राहत आहेत.
त्यामुळे घटस्फोटांबाबतची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी राज्यात कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात यावे किंवा न्यायालयात आठवड्यातून एक दिवस अशा प्रकरणांवर सुनावणी घ्यावी, अशी मागणी प्रश्नोत्तराच्या तासाला तुयेकर यांनी केली.
त्यावर बोलताना कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले की, कौटुंबिक न्यायालयासाठी जिल्ह्याची लोकसंख्या दहा लाख असणे गरजेचे आहे. गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये तितकी लोकसंख्या नसल्यामुळे राज्यात कौटुंबिक न्यायालये स्थापन होऊ शकत नाहीत.
घटस्फोटांच्या प्रकरणांवर स्वतंत्र सुनावण्या घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालये स्थापन करणे शक्य नाही. पण अशा प्रकरणांच्या सुनावण्या ज्या न्यायालयांमध्ये सुरू आहेत, तेथे आठवड्यातून एकदा या प्रकरणांची सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आमदार उल्हास तुयेकर यांना दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.