पणजी: शिरगावच्या लईराई देवीच्या जत्रोत्सवात सात भाविकांचा जीव गेला. प्रशासनाच्या हलगर्जीपणा या घटनेस कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसते. घटनेचे कारण धोंड आणि भक्तांवर टोलवून चालणार नाही. या घटनेची उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी गोवा काँग्रेस प्रभारी माणिकारव ठाकरे यांनी केली. तसेच, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमींना सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे देखील ठाकरे म्हणाले. ठाकरे सध्या गोवा दौऱ्यावर आहेत.
काँग्रेस भवनात शनिवारी (3 मे) सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा खलप आणि इतर नेत्यांनी उपस्थिती नोंदवली.
ठाकरे म्हणाले की, ''काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी लईराई देवीच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी सूचना करताच आपण दिल्लीवरुन थेट गोव्यात पोहोचलो. ज्या ठिकाणी रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, त्याठिकाणी आम्ही त्यांची विचारपूस केली. ज्यापद्धतीने ही घटना घडली, अशाप्रकारची घटना कधीही गोव्यात घडलेली नाही. परंतु सरकारने ज्या पद्धतीने व्यवस्था निर्माण करायला हवी होती, ती करण्यात आली नव्हती हे या घटनेवरुन स्पष्ट दिसून येते. छोटा रस्ता, पन्नास हजारांवर गर्दी असणार हे लक्षात घेऊन व्यवस्था करणे आवश्यक होते, त्याशिवाय रांगेत जाण्यासाठी धोंडांसाठी जागा अपुरी असतानाही तिथे सुधारणा करण्याचे काम प्रशासनाने केले नाही.''
ठाकरे पुढे म्हणाले की, ''खऱ्या अर्थाने या घटनेत सरकारच्या चुका आहेत. धोंड आणि नागरिकांमुळे ही घटना घडल्याचे सरकारने सांगणे चुकीचे आहे. या घटनेवरुन कायदा आणि सुव्यवस्था राज्यात नसल्याचे दिसते. सत्ता, मंत्रिपदाचा लाभ घेणे आणि अशा घटना घडल्यावर लोकांवर आरोप करणे, यावरुन सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. मृत्युमुखी पडलेल्या, जखमींना काही मदत जाहीर करुन लोकांना खूष होतील, असे वाटत असेल तर सरकारला जनताच प्रश्न विचारेल. सरकार नक्की कोणता खेळ करत आहे, असे सांगणे चुकीचे आहे. लोकांची गर्दी होत असते, तेव्हा त्याठिकाणी सुविधा निर्माण करणे किवा उपाय योजना करणे सरकारचे काम असते. गोमेकॉमध्ये 13 पैकी 7 जण गंभीर आहेत, त्याशिवाय शंभरच्यावर जखमी झाले आहेत. ज्या कुटुंबातील व्यक्ती मृत्युमुखी झाले आहेत त्यांना 20 लाख आणि गंभीर जखमी आहेत त्यांना 10 लाख आणि किरकोळ जखमींना 5 लाखांची मदत सरकारने द्यावी.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.