Mahadayi Water Dispute: राज्य सरकारला गोमंतकीय जनतेचे काहीच पडलेले नाही. हे सरकार जनहितविरोधी कार्य करत आहे. त्यामुळे आता जनतेनेच पेटून उठले पाहिजे, असे आवाहन गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केले.
चावडी-काणकोण येथे आज सोमवारी म्हादईच्या रक्षणार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. दरम्यान, या सभेला उपस्थित सर्वच वक्त्यांनी म्हादईप्रश्नी केंद्र व राज्य सरकारच्या सौदेबाजीचा जाहीर निषेध केला.
गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी १ मार्चला वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊ नये असा अप्रत्यक्षरीत्या सांगावा शिक्षण संचालकांनी पाठविला आहे. सरकारने चालविलेली ही मुस्कटदाबी असून ती आता सहन केली जाणार नाही, असे सरदेसाई म्हणाले.
केंद्र सरकारच्या दबावाखाली सावंत सरकार सावंतवाडी व कर्नाटकाच्या भल्यासाठी काम करीत आहे, असा आरोप साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी केला.
‘आरजी’वाल्यांना भाजपनेच पदयात्रा काढायला लावली व त्यांनीच ती अडविली. ‘आरजी’ही भाजपची ‘बी’ टीम आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
यावेळी फादर बॉलमेक्स परेरा, तारा केरकर, शंकर पोळजी, जनार्दन भंडारी, संदेश तेलेकर, रामा काणकोणकर, प्रतिमा कुतिन्हो यांचीही भाषणे झाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.