किंबर्ली कुलासो
सायकलिंगचा आनंद आणि फायदा समजावून देणारा जागतिक सायकल दिन या आठवड्यात, 3 जून रोजी साजरा झाला. साऱ्या जगभर आज सायकलिंगचे महत्व वाढत असताना गोव्यात मात्र सायकलिंगचा आनंद घेऊ पाहणाऱ्या अनेकांना गोव्याच्या रस्त्यांचे कठोर वास्तव भेडसावत आहे व ते त्यांना या आनंदापासून दिवसेंदिवस दूरही नेत चालले आहे.
साविया विएगस या साहित्यिका आहेत त्याचबरोबर त्या कुशल आणि अनुभवी सायकलपटूही आहेत. आपले पती अनुप बाबनी यांच्या समवेत गोव्यातील नयनरम्य गावांमधून सायकलची स्वारी करणे त्यांना खूप आवडायचे. मात्र झालेल्या अपघातामुळे त्यांना भोगावे लागलेले घाव केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकही होते.
त्यामुळे वर्षापूर्वी सायकल चालवणे थांबवण्याचा वेदनादायक निर्णय त्यांना घ्यावा लागला. त्या सांगतात, 'सायकलिंग थांबवण्याचा खेद मला होतो आणि त्याचबरोबर काहीतरी हरवल्याची भावनाही मनात निर्माण होते. परंतु वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने परिस्थिती इतकी धोकादायक आहे की जिवंत राहावे की रस्त्यावर मरण्याचा धोका पत्करावा या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करण्याचा हा निर्णय होता.'
ही फक्त एका सावियाची खंत नाही. गोव्यातील अनेक सायकलप्रेमी अशीच चिंता आणि भीती व्यक्त करतात. जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने शाश्वत गतिशीलता आणि निरोगी जीवन या संबंधात चर्चा झडली असली तरी गोव्यातील सायकलिंग समुदाय येथील वेगळ्या परिचित आव्हानांचा सामना करत होते: अतिशय खराब पायाभूत सुविधा, रस्त्यांवरील खड्डे आणि भटक्या प्राण्यांचा सततचा धोका या सर्व कारणांमुळे त्यांना सायकल चालवणे हे फायद्यापेक्षा अधिक धोकादायक वाटत चालले आहे.
वेगवान आणि बेपर्वा वाहन चालवल्यामुळे देशात रस्त्यावर दरडोई सर्वाधिक मृत्यू होण्याचे वेगळेपण गोव्याने प्राप्त केले आहे. सावियाचे पती अनुप म्हणतात, 'सायकल स्वारांसाठी रस्ता-सुरक्षा ही अतिशय कळीची बाब बनली आहे. पर्यटक आणि स्थानि कांकडून बेशिस्तपणे चालवल्या जाणाऱ्या गाड्या आणि मोटरसायकली ही मुख्य समस्या आहे. चांगल्या रस्त्यांवर वेगाने चालवल्या जाणाऱ्या गाड्या हे सायकल स्वारांसाठी मुख्य आव्हान बनले आहे.
साष्टी रायडर्स ही सायकलप्रेमींची एक संस्था आहे. तिचे अध्यक्ष माल्कम कुएल्हो म्हणतात की सायकल चालवण्याची आवड त्यांच्यात निर्माण झाल्यानंतर गोव्याच्या सौंदर्याची खरी प्रचिती त्यांना आली. मात्र रस्ता सुरक्षेचा विचार केल्यास त्या व्यवस्थेत बदल घडून येणे आता गरजेचे झाले आहे. 'सायकलस्वारांना संरक्षण देणारे आणि रस्त्यावरची त्यांची असुरक्षितता ओळखून त्यांना मार्गाचा अधिकार देणारे एक समर्पित कलम कायद्यात असायला हवे. त्यातून सायकलस्वारांच्या सुरक्षिततेबद्दलच्या 70% समस्या सुटू शकतील.'
गोव्याचे रस्ते रुंद होत चालले आहेत हे स्वागतार्ह असले तरी माल्कम आणखीन एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधतात, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. 'मुंबईत नियमितपणे रस्ता झाडण्यासाठी व्हॅक्युम-सुसज्ज ट्रक वापरला जातो. व्हॅक्युममुळे रस्त्याच्या कडाही स्वच्छ होतात आणि सायकलस्वारांना मुख्य रहदारीला अडथळा न आणता सुरक्षितपणे एका कडेने सायकल चालवता येते. ही पद्धत गोव्यात राबवली गेल्यास येथील सायकलस्वारांना त्याचा फायदा होऊ शकतो.'
मानसोपचार तज्ज्ञ बेलिंडा व्हिएगस म्युलर या एक निपुण सायकलपटू आहेत. त्यांनी 1,200 किलोमीटरची बीआरएम (ब्रेव्हेट्स डी रेन्डोन्यूर्स मोंडियाक्स) ही सहनशक्तीची परीक्षा घेणारी सायकल शर्यत ९० तासांत (निद्रा, विश्रांती आणि जेवण यासहित) एका वर्षात तीन वेळा पूर्ण करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. त्यांचे म्हणणे आहे की गाड्या किंवा मोटरसायकल चालवण्याचा परवाना देण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूलने खूप कठोर नियम लागू केले पाहिजेत.
'वाहनचालकांनी सायकलस्वारांपासून किमान १.५ मीटरचे सुरक्षित अंतर राखले पाहिजे याची जाणीव करून देण्यासाठी योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. गोव्यात अनेकदा मी गाडी चालवणाऱ्यांना उजवीकडचा सिग्नल देताना पाहिले आहे, परंतु त्यांना जिथे थांबणे आवश्यक आहे त्या मधल्या लेनमध्ये ते थांबण्यास तयार नसतात. त्याऐवजी सायकलस्वारांवर दबाव टाकत, त्यांना ओलांडून ते जातात. काही चालक रस्त्यावर खड्डा दिसल्यास गाडी अचानक उजवीकडे किंवा डावीकडे वळवतात जे धोकादायक असते.' गोव्यातील एक सकारात्मक अपवाद मात्र त्या नोंदवतात- त्यांच्या अनुभवानुसार, आंतरराज्य ट्रक चालक हे रस्त्यावरील सर्वात आदरणीय चालक आहेत जे सातत्याने सायकलस्वारांपासून सुरक्षित अंतर राखतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.