संवाद साधण्याच्या प्राथमिक मानवी गरजेतून लेखनकलेचा जन्म झाला. ती जतन आणि प्रतिबिंबाच्या सर्वोच्च साधनात विकसित झाली. मानवाने विकासाच्या एका टप्प्यावर माती, दगड आणि हाडे अशा वस्तूंवर चिन्हे कोरून, खुणांद्वारे आपल्या अस्तित्वाचे जतन करण्याचा करण्याचा प्रयत्न केला.
लेखनकला ही अनुभव आणि निरंतर स्मृतींमधील दुवा आहे. काळ, भूगोल आणि मृत्यूच्या पलीकडे जाणाऱ्या कलेपैकी एक असल्याचा अनुभव, मेसोपोटेमियाच्या क्यूनिफॉर्मपासून ते इजिप्शियन चित्रलिपी आणि ग्रीस, चीन व भारताच्या नंतरच्या अक्षरांपर्यंतचा प्रवास आपल्याला दाखवून देतो.
लेखनकलेने समाजाच्या प्रगतीच्या काळात ‘डॉक्युमेंटेशन’च्या पलीकडे जात मानवी आचार-विचार, मानसिकता, व्यवहार अशा गोष्टींत लक्ष केंद्रित करत, समाजातील कायद्यांची संहिता तयार केली, ज्ञानाच्या मर्यादा वाढवल्या, नैतिक मूल्यांचा प्रसार करून संस्कृतींचे दर्शन घडवले.
तसेच समाजांच्या आत्म-साक्षात्काराला कारणीभूत असलेल्या कल्पनाशक्ती आणि मतभेदांचे विचार मांडले. जेव्हा जगात भीतीमुळे भाषणांवर मर्यादा आल्या तेव्हा विवेकी संरक्षक म्हणून लेखनकला उभी राहिली.
जागतिक कला-संस्कृती आणि ऐतिहासिक ठेवा यांचे संवर्धन स्मारके, अवशेष यांच्याबरोबर लिखित शब्दाद्वारे केले जाते. हस्तलिखिते, इतिहास, पत्रे आणि साहित्याद्वारे, लेखन आपल्याला लुप्त झालेल्या भूतकाळातील शतकांच्या श्रद्धा, भावना आणि दुविधा प्रकट करते.
लेखनकलेतून मानवजातीच्या वैयक्तिक आणि सामूहिक स्मृतीतून, विजय आणि अपराधांचा संग्रह केला जातो. सेन्सॉरशिप किंवा हुकूमशाहीच्या सावलीत जगलेल्या भूतकाळ आणि वर्तमान काळातील जगात, लेखनकलेने शांतिदूत बनून, विकृतीला विरोध करत,
सत्याच्या रक्षकाचे काम केले आहे. वंशजांना त्यांच्या पूर्वजांच्या नैतिक आणि बौद्धिक स्वभावाचे दर्शन लेखनाद्वारेच होते. संस्कृतीचे सातत्य आणि इतिहासाची निश्चितता लेखनकलेवर अवलंबून आहे.
भारतातील वसाहतवादी काळात लेखनाच्या कलेला वेगळीच कलाटणी मिळाली. ब्रिटिश-पोर्तुगीजांसारख्या राजवटीत, जेव्हा उघड बंडे दडपली गेली, तेव्हा भारतीय लेखकांनी साहित्याला गुप्त स्वातंत्र्याच्या भाषेत परावर्तित करत, देशभक्ती रूपक, धर्म आणि लोककथांमध्ये लपवली.
मुक्ततेचा आत्मा शोधत असलेले बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे भक्तिमय गद्य, बंडखोरीला दैवी प्रकटीकरणाचे रूप दिलेल्या सुब्रमण्यम भारती यांच्या कविता, तसेच प्रादेशिक भारतीय साहित्याने साम्राज्यवादाचा प्रतिकार आणि राष्ट्रीय चेतना जागृत करण्यासाठी प्रतीकात्मकतेचा वापर केला. नाटके, गाणी, कथा-कादंबऱ्यांमधून निर्मितीचे स्वरूप राखत वसाहतवादी जुलूमशाहीला आव्हान दिले गेले.
प्रत्येक युग लेखकांना त्यांच्या काळातील वास्तवांना भिडण्याचे आव्हान देते. आधुनिक युगात, जिथे माहिती आणि सूचना मुबलक असूनही त्या विकृत केल्या जातात, तेव्हा लेखकाची भूमिका धाडसी आणि नाजूक बनते. जेव्हा उघड मतभेदांना मर्यादा संभवतात, तेव्हा लेखकांनी पुन्हा अर्थ, विडंबन आणि दृष्टांताच्या भाषेकडे वळणे योग्य ठरेल.
प्रामाणिक लेखक/लेखिकेची प्रमुख जबाबदारी विवेकशून्य सत्ताधाऱ्यांचा उदो-उदो करणे नसून, सचोटी जपणे आहे. लिखित शब्दाने प्रश्न विचारत लेखक/लेखिकेने अनुरूपतेला विरोध करत आणि सामूहिक विवेकाचे पालनपोषण करत, वर्तमानातील गुंतागुंतींचे दस्तऐवजीकरण करून, भविष्यातील पिढ्यांना आपल्या काळाचे प्रामाणिक, सामाजिक, राजकीय आणि नैतिक प्रतिबिंबाचे दर्शन घडेल याची काळजी घ्यावी.
लेखन जीवनानुभवातूनच उदयास येते. उपेक्षितांचे आवाज, सहनशक्तीचा दीर्घ सामना केलेले गुलाम, शोषित कामगार आणि स्त्रिया, वगळलेल्या जातींनी, साहित्याच्या नैतिक उत्क्रांतीला खोलवर आकार देताना, त्यांच्या संघर्ष आणि सहनशीलतेने, अनेक अभिजात कलाकृतींचा अदृश्य पाया बनवला.
लेखनकलेने प्रामाणिकपणा जपण्यासाठी, सहानुभूती आणि सत्याच्या पलीकडे जाऊन, समाजाच्या विसरलेल्या लोकांच्या मूक वेदना व्यक्त करणे महत्त्वपूर्ण ठरते. तसेच इतिहासात, शक्तिशाली वर्गांनी अनेकदा सौंदर्य किंवा बौद्धिक फायद्यासाठी, शक्तीहीनांच्या अनुभवांचा वापर केल्याचे दिसून येते. अशा विकृती लेखकाच्या नैतिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. शाश्वत मानवी अनुभव केवळ निरीक्षणांतून नव्हे तर सहभागातून सादर करण्याच्या कृतीत लेखनाचा प्रामाणिकपणा दिसून येतो.
लेखनकला हे सभ्यतेचे लवचिक स्मारक आहे. राज्ये कोसळली, शक्तीसमोर आवाज क्षीण झाला तरी ‘शब्द’ टिकले जाऊन ते नैतिकतेचा आणि मानवी आकांक्षेचा ठसा उमटवतात. म्हणूनच, लेखन कलाकृतीच्या निर्मितीबरोबरच सत्याचे रक्षण करते. माध्यमे आणि वैचारिक आवाजाने भरलेल्या युगात, लेखकांनी भाषेचे पावित्र्य जपून स्पष्टतेने लिहावे,
समाजातील लोकांना गोंधळात न टाकता, त्यांना न भडकावता, विभाजन टाळण्यासाठी, न्याय प्रक्रिया जपण्यासाठी आणि मानवी प्रतिष्ठा संवर्धित करण्यासाठी लिहावे. लेखनकला ही नोंद आणि प्रकटीकरण, काळ आणि सत्य यांच्यातील एक पवित्र संवाद असलेली कला आहे. वेदनेचा आक्रोश, धाडसाच्या कृती आणि तर्कशक्तीचा आवाज जगातून पूर्णपणे नाहीसा होणार नाही, याची खात्री असूनही प्रामाणिकपणा-संयमाने लिहिणाऱ्या लेखिका/लेखकांमुळेच संस्कृतीचे प्रतिबिंब आणि सत्य जपले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.