भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाने अमेरिकेत बनवलेल्या एफ-१६ आणि चीनच्या जेएफ-१७ या आधुनिक लढाऊ विमानांसह ८ ते १० पाकिस्तानी विमाने पाडल्याची माहिती त्यांनी दिली. ९३ व्या हवाई दल दिनाच्या समारंभात त्यांनी ही माहिती दिली.
एअर चीफ मार्शल सिंह यांनी सांगितले की ७ मे रोजी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानला मोठं नुकसान सहन करावं लागलं. ४-५ एफ-१६ आणि जेएफ-१७ श्रेणीतील विमाने, तसेच एक पाळत ठेवणारे AEW&C किंवा SIGINT विमान हवेत पाडलं. तसंच भारतीय हवाई दलाने ३०० किमी आत पाकिस्तानी हद्दीत कारवाई करत दीर्घ पल्ल्याचा हल्ला केला. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला ठरल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानी लष्करी हवाई तळांवर केलेल्या हल्ल्यांची माहिती देताना एअर चीफ मार्शल म्हणाले की आणखी ४-५ एफ-१६ विमाने जमिनीवर नष्ट झाली. चार ठिकाणी रडार, दोन कमांड अँड कंट्रोल सेंटर, दोन रनवे, तीन हँगर्स तसेच एक सरफेस-टू-एअर मिसाईल (SAM) सिस्टम उद्ध्वस्त करण्यात आली. एकूण ११ पाकिस्तानी हवाई तळ भारतीय हल्ल्यांचे लक्ष्य ठरले.
या हल्ल्यांमुळे पाकिस्तानला प्रचंड रणनीतिक व मानसिक धक्का बसला. परिणामी, इस्लामाबादला युद्धबंदीसाठी भारताशी संपर्क साधावा लागला, अशी माहिती हवाई दल प्रमुखांनी दिली. "आम्ही पाकिस्तानला अशा टप्प्यावर पोहोचवलं, जिथं त्यांना युद्धबंदीसाठी आमच्याकडे यावं लागलं," असे ते म्हणाले.
याच आठवड्यात संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सात भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना एअर चीफ मार्शल सिंह यांनी त्यांचा दावा खोटा असल्याचं सांगितलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.