Malegaon Blast Case Court Verdict: महाराष्ट्राच्या इतिहासात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Bomb Blast) प्रकरणाची प्रतीक्षा 17 वर्षांनंतर अखेर संपली. 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) विशेष कोर्टाने गुरुवारी (31 जुलै) सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर, सुधाकर धर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी या सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली.
एनआयए (NIA) कोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, पुराव्याअभावी (Lack of Evidence) सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. या प्रकरणातील अंतिम युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, 19 एप्रिल रोजी कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता, जो गुरुवारी जाहीर करण्यात आला.
पुराव्यांचा अभाव: बॉम्ब (Bomb) किंवा आरडीएक्स (RDX) घटनास्थळी सापडले नाही, तसेच कोणतेही फिंगरप्रिंट (Fingerprint) मिळाले नाहीत.
तपास यंत्रणांमधील फरक: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि एनआयएच्या (NIA) आरोपपत्रांमध्ये (Chargesheet) मोठी तफावत होती.
प्रकरण सिद्ध न होणे:
अभियोजन पक्ष (Prosecution) हे सिद्ध करु शकला नाही की, बॉम्ब मोटरसायकलमध्ये (Motorcycle) होता.
कर्नल पुरोहित यांनी बॉम्ब बनवला किंवा त्याचा पुरवठा केला, हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत.
बॉम्ब नेमका कोणी लावला हे देखील सिद्ध झाले नाही.
पुरावे संकलनातील त्रुटी: घटनेनंतर तज्ज्ञांनी पुरावे योग्य प्रकारे गोळा केले नाहीत, ज्यामुळे पुराव्यांमध्ये संशयास्पदता निर्माण झाली.
पंचनामा आणि तपास: बॉम्बस्फोटानंतर पंचनामा (Panchnama) व्यवस्थित केला गेला नाही, घटनास्थळावरुन फिंगरप्रिंट्स घेण्यात आले नाहीत आणि बॉम्बसाठी वापरण्यात आलेल्या दुचाकीचा चेसिस नंबर (Chassis Number) कधीही सापडला नाही.
मालकीचा प्रश्न: ती मोटरसायकल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर होती आणि तिचा बॉम्बस्फोटाशी संबंध होता, हे देखील सिद्ध होऊ शकले नाही.
कोर्टाने स्पष्ट केले की, सातही आरोपी निर्दोष आहेत आणि केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही शिक्षा दिली जाऊ शकत नाही. कोर्टाने हे देखील महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले की, दहशतवादाला कोणताही धर्म नसतो (Terrorism has no religion).
दरम्यान, 29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील मालेगाव येथे रमजानच्या पवित्र महिन्यात आणि नवरात्रीच्या अगदी आधी एक स्फोट झाला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. एका दशकाहून अधिक काळ चाललेल्या या खटल्यादरम्यान, अभियोजन पक्षाने 323 साक्षीदारांची (Witnesses) चौकशी केली, त्यापैकी 34 जण आपल्या सुरुवातीच्या जबाबावरुन (Statement) फिरले.
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी दलाने (ATS) केला होता. मात्र, 2011 मध्ये हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडे सोपवण्यात आला. या प्रकरणात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, माजी भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह सात जणांवर बेकायदेशीर प्रतिबंध कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांतर्गत आरोप लावण्यात आले होते. सर्व आरोपी सध्या जामिनावर (Bail) बाहेर होते. मात्र, या निकालानंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले असून, यावर विविध राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.