Samruddhi Expressway Dainik Gomantak
ब्लॉग

Samruddhi Expressway : ‘सरळ’ रस्त्याची वाकडी गत

जितकी गती वाढत आहे, तितकी माणसाची दुर्गती होत आहे. तंत्रज्ञान, साधने यांच्या गतीमुळे वाचलेल्या वेळेचा आपण नेमका काय उपयोग करतो, यावर गतीमुळे आपली प्रगती होत आहे की, अधोगती हे ठरते.

गोमन्तक डिजिटल टीम

कमलाकर साधले

जितकी गती वाढत आहे, तितकी माणसाची दुर्गती होत आहे. तंत्रज्ञान, साधने यांच्या गतीमुळे वाचलेल्या वेळेचा आपण नेमका काय उपयोग करतो, यावर गतीमुळे आपली प्रगती होत आहे की, अधोगती हे ठरते. हा उरलेला वेळ आनंद देण्याऐवजी ऐतखाऊ व आळशी बनवत असेल, तर ती अधोगती आहे. या गतीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी संयम हवा. संयम नसेल, तर पुढे यम असतोच. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावरील अपघातांची बातमी सर्व मराठी व महाराष्ट्रातील इतर वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठांवर झळकली.

या महामार्गात ज्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात होत्या त्यांनी बराच काळ आंदोलन करून मार्ग अडवून धरला होता. हा एक अतिजलद मार्ग असल्याने कमीत कमी लांबी अन् त्यासाठी कमीत कमी वळणे या तत्त्वावर आखला होता. त्या तत्त्वानुसार तो बदलणे योग्य ठरत नव्हते म्हणू भरपूर नुकसानभरपाई देऊन जमिनीचे अधिग्रहण झाले, असे ऐकतो.

महामार्गाचा हेतू त्याच्या ‘समृद्धी’ या त्याच्या नावात सांगितला गेला आहे. आजच्या आर्थिक परिभाषेत समृद्धी म्हणजे वाढीव आर्थिक व्यवहार. त्यातून जास्त पैसा मिळेल. देशाची समृद्धी वाढेल. हे एक सरळसोट वाटणारे समीकरण.

गेल्या काही वर्षांत एकूण देशाची ही आर्थिक समृद्धी निश्‍चित वाढलेली आहे. त्याबरोबर श्रीमंत व गरीब यांमधील दरीही वाढत चाललेली आहे. निरनिराळ्या देशांतील कुपोषितांच्या संख्येत भारताचा क्रमांक बराच वरचा आहे. याचा अर्थ ही समृद्धीची वाट पुंजिपतींची आहे सामान्यांची झाली असेल तर नाममात्र.

या नव्या कोऱ्या जलदमार्गावरील जलद अपघातांच्या मालिकेतून जी माहिती पुढे आली त्यातून स्वच्छ दिसू लागले की, रस्त्यांच्या दर किलोमीटरमागे अपघाती मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय महामार्गांवर सर्वाधिक आहे. त्याहून जास्त लांबीच्या राज्य महामार्गांवर त्याहून कमी आहे. इतर सरसकट रस्त्यांची लांबी सर्वाधिक आहे, तेथे हे प्रमाण अजून कमी आहे. वास्तविक राज्य महामार्गांचे बांधकाम इतर रस्त्यांहून चांगले आहे.

राष्ट्रीय महामार्गांचे त्याहून चांगले. जेवढे रस्ते चांगले तेवढी वाहनांची गती जास्त. मग वाहनांची गती हाच घटक याला कारणीभूत आहे का? तो आहेच, पण इतरही काही आहेत. अंतर कमी करण्यासाठी आखलेली सरळ रेषा जैविक मानसिकतेस प्रतिकूल आहे. कुठल्याही प्राण्याची चाल फार काळ सरळ रेषेत नसते.

वेगवान वाहनांच्या बाबतीत बराच काळ तोचतोचपणा आला की एक प्रकारचा कंटाळा येतो. तेच ते मर्गिकेचे पांढरे पट्टे, तेच ते सतत रस्त्याचे एकसुरी दृश्य. त्यामुळे हलकेच डुलकी येते. या ‘महामार्ग संंमोहना’मुळे (हायवे हिप्नोटिक्स) डुलकीची शक्यता असतेच. क्लोजिंग -ओपनिंग व्हिस्टा म्हणजे दृश्य-बदल हे तंत्र शहरातील कमी लांबीच्या रस्त्यांनाही नगररचनेत सुचविले गेले आहे. सपाट माळावरीलही प्राण्यांच्या, माणसांच्या पायवाटा सरळ नसतात. सृष्टीतील गतिमान घटक म्हणजे पाणी. ते कधीच सरळ रेषेत धावत नाही.

नैसर्गिक नदीपात्राचे काठ सतत चित्र बदलतात.नवे संदर्भ सादर करतात. तशीच प्रदीर्घ जैविक इतिहासातून साकारलेल्या जनुकीय मानवी मानसिकतेची सुप्त नैसर्गिक अपेक्षा असते. बदलत्या दृश्याची विविधता हा सृष्टीचा आत्मस्वर आहे. मानवी जनुकांत खोलवर सुस्थापित आहे. तो येथे अव्हेरला गेल्यामुळे हे घात घडत आहेत.

तिसरा मुद्दा गतीचा, सर्वांत महत्त्वाचा स्वच्छ तुळतुळीत रस्ता आखून दिलेल्या मार्गिका मध्ये कोणी येण्याची शक्यता नाही. म्हणून गती वाढविण्याची ईर्ष्या निर्माण होते. जेवढी जास्त गती तेवढा चालकाचा वाहनावरील ताबा पक्का असावा लागतो. पुढे धोका दिसल्यावर गाडी नियंत्रणात आणणे, थांबविणे किंवा दुसऱ्या मार्गिकेत वळविणे याला थोडा वेळ जातो तोवर मागून त्याच मार्गिकेमधून येणारी गाडी तिला येऊन ठोकते.

त्यामुळे जलद मार्गावरील अपघात चार-पाच वाहनांचा एकत्रित अपघात ठरतो. तुफान गतीच्या अभिनिवेशात वाहनचालकाची सतत दक्षता अत्यावश्यक असते. सतत तासतास चालविणाऱ्या चालकाच्या मानवी क्षमतेच्या दृष्टीने दक्ष असणे अशक्य असते. महामार्गांवर बहुतांश वाहने म्हणजे मालवाहू ट्रक. या सततच्या रटाळपणात थोडीशी ‘जान’ येण्यासाठी थोडी दारू ढोसलेली असते किंवा वाटेत ढाब्यावर एखादा चटकदार पदार्थ जास्त खाल्लेला असतो.

पोट जरा जड झालेले असते. असे अनेक मानवी घटक असतात. ज्यांच्यासाठी ही गती समर्पक नसते. अमुक वेळेच्या आत अमुक ठिकाणी पोहोचायचे अशी निर्धारित केलेली उद्दिष्टे असतात त्यासाठी नियोजित गती हे दडपण घेऊन वाहन चालविणे घडत असते आणि जादा अवसान आणून ती उद्दिष्टे पुरी करण्याचा प्रयत्न केला जातो.

सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला वैद्यकीय, इंजिनिअरिंग, आयटी वगैरे कोर्सला जाण्यासाठी जादा ट्युशन्स लावून परीक्षेत टक्केवारी गाठण्याचे एवढे दडपण घातले जाते की त्यात सपशेल अपयश आल्यास तो आत्महत्येपर्यंत जातो. ही स्पर्धा, ही न सोसणारी गती हे आजच्या ‘प्र’गतीचे व्यवच्छेदक लक्षण.ती निसर्गाने प्रत्येकाला जीवनानंदासाठी रचलेल्या जनुकीय क्षमतांबाहेर गेल्याने सदैव ताण, दडपण यांखाली राहावे लागते.

हे ताणतणाव, दडपणे, दुसऱ्यांनीच निर्धारित केलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी गतीची अनिवार्यता. त्यातून अपघात घडू शकतात किंवा शारीरिक, मानसिक आजार अशा ‘दु’र्गतीने ग्रासलेला समाज निरोगी जीवन व निर्भेळ आनंद कसा प्राप्त करणार? भारतीय रागदारीतील संगीतातील लय, गती श्रोत्यांच्या तरल भावभावना एका लयीवर लहरत ठेवते. त्यातून एक उच्च प्रतीचे समाधान लाभते. पाश्‍चात्त्य संगीताची गती उन्मादक असते, ती बेबंद नाचायला लावते.

शास्त्रोक्त संगीताची मैफल आणि रेव्ह पार्टीतील धिंगाणा यात प्रचंड फरक आहे. दुसऱ्या प्रकारात कानठळ्या बसणारे संगीत, डोळे दिपविण्याच्या डिस्को लायटिंगचे भपकारे, त्या नशेला अजून बेबंद करणारी दारू, अमली पदार्थ, ही अतिगतीची संस्कृती. हे बेबंद गतीचे प्रकार शेवटी माणसाला नशेच्या गर्तेतच नेऊन टाकतात.

ठरावीक मर्यादेपलीकडे गती ही प्रगती आणत नाही. दुर्गतीच आणते. दूरदूरच्या वस्तू चटकन आणून देण्याची साधने, त्यामागे अडकलेली व्यवस्था, साधनसुविधा, पेट्रोल-डिझेल, कोळसा-वीज हे ऊर्जास्रोत साधनसामग्री, मनुष्यबळ व्यवस्थापन हे गिळणारा बकासुर आहे.

प्रत्येक जण एक दुसऱ्याचा वेळ अप्रत्यक्षपणे खात असतो, एकमेकांची साधनसामग्री हिसकावीत असतो. या शोषितात गरीब जनता असते, सूक्ष्म जीवांपासून महाकाय प्राण्यांपर्यंत आणि बुरशी-शेवाळापासून गगनचुंबी वृक्षांपर्यंत वनस्पतीविश्‍व सर्वांचे असते. जल-भूमी-आकाश सर्वांचे आरोग्य बिघडते. पर्यावरण व जीवनशाश्‍वती उद्ध्वस्त होते.

जीवनात सुख, समाधान, सुरक्षा-शाश्‍वतता ही अंतिम जीवनमूल्ये भूत- वर्तमान-भविष्य या त्रिकालातही अनिवार्य अशी. ती साधायची असल्यास जे काय करणे गरजेचे आहे त्यात गतीची सुगमता हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. आजची पुढे पुढे(?) जाण्यासाठी स्पर्धा, त्यासाठी जीवघेणी गती, ती गती प्राप्त करण्यासाठी वेगवान वाहने, महामार्ग, उड्डाणपूल, विमानतळ, इंधनसाठा हे सर्व दिवसेंदिवस करू तेवढे अपुरे पडत आहे.

जलदीबाजीच्या सोई वाढल्या लांबलांबची ठिकाणे कमी वेळात जोडली गेली. म्हणून जीवनानंदासाठी दिवसातला मोकळा वेळ वाढला का? उलट पूर्वीपेक्षा तो कमी झालेला दिसतो. कारण त्यातून भौतिक भोगवादाच्या कक्षा वाढल्या. दूरदूरचा प्रवास वाढला. दूरदूरच्या वस्तूंची ने-आण वाढली. वस्तूंचा वापर वाढला, त्यांचा कचरा वाढला.

यासाठी ऊर्जेचा वापर वाढला, प्रदूषण वाढले. तराजूचे एक ताट खाली गेल्यावर दुसरे वर जाणारच पृथ्वीवरील साधनसामग्री- भूमीतील खनिजाचे साठे, भूमीवरील, भूगर्भातील पाणी कमी झाले, उत्तर-दक्षिण ध्रुवांवरील, पर्वतशिखरांवरील बर्फ कमी झाले. हवेतील प्राणवायू कमी होऊ लागला. जंगलझाडी घटली. जीवजातींची संख्या, त्यांची विविधता रोडावली. परिसरातील मोकळ्या जागा आकसल्या, अंतरंगातील व अवकाशातील शांतता दुर्मीळ झाली.

भोग वाढले, वखवख वाढली. समाधान दुर्मीळ झाले. यावर उपाय काय? उपभोगाच्या ॲक्सलरेटरवरील पाय काढून संयमाच्या ब्रेकवर आणा. जीवनशैली वरच्या गियरमधून खालच्या गियरमध्ये आणा. नपेक्षा ही बेफाम चाललेली गाडी केव्हा कुठे धडकेल सांगता येणार नाही. गाडीत पेट्रोल, प्लास्टिक, पेपर, वीज, कपडा हे ज्वालाग्राही पदार्थ आहेत. तापमानवाढीमुळे कधी पेट घेतील सांगता येत नाही. मौजमजेच्या, गतीच्या कैफात तुमचे ‘दस सरले पाच उरले’ असतील, पण गाडीतील मुले-नातवंडे -पतवंडे यांचे काय?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT