chhatrapati shivaji maharaj Statue At Calangute Dainik Gomantak
ब्लॉग

मागोवा नी सांगावा : छत्रपती शिवरायांचे गोव्याशी नाते

आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून भांडतो आणि त्यांची एकात्मतेची दृष्टी विसरतो हे दुर्दैव! अस्मिता हा कायदेशीर मार्गाला पर्याय होऊ शकत नाही. परवानगी न घेता पुतळा उभारणे आणि अस्मितेच्या नावाआड त्याचे समर्थन करणे शिवाजी महाराजांनाही पटणार नाही.

दैनिक गोमन्तक

सुशीला सावंत मेंडीस

कळंगुटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून आजकाल जोरदार वाद सुरू आहे. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत सर्व मराठा सरदारांना एकत्र आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान अढळ आहे.

शिवाजी महाराजांचे नेतृत्वगुण आणि पराक्रम याबद्दल दुमत असूच शकत नाही. पुतळा स्थापन करण्याला विरोध आहे कायदेशीर बाबींची पूर्तता न करणे व पंचायतीचा परवाना न घेता पुतळा बसवला यावर आहे. मराठ्यांसाठी शिवाजी महाराज देवतुल्य आहेत.

पोर्तुगीज मराठा संबंध या विषयावर तीन महत्त्वाचे स्रोत आहेत. डॉ. पांडुरंग एस. पिसुर्लेकर यांनी लिहिलेला ‘पोर्तुगीज - मराठा संबंध अर्थात पोर्तुगीज दफ्तरातील मराठ्यांचा इतिहास’ या शीर्षकाचा मराठी प्रबंध १९६७ मध्ये प्रकाशित झाला. १९७५मध्ये ‘द पोर्तुगीज अँड द मराठाज - दिवंगत डॉ. पांडुरंग एस. पिसुर्लेकर यांच्या लेखांचे भाषांतर, पोर्तुगीज भाषेत ‘पोर्तुगीज इ मारात्स (१६५८ -१७८५)’ या शीर्षकासह, अधिक तपशीलवार इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाली, ज्याचे भाषांतर पी. आर. काकोडकर व महाराष्ट्र सरकारच्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारा प्रकाशित करण्यात आले. तिसरा स्रोत म्हणजे ‘केंद्रशासित प्रदेश गोवा, दमण आणि दीव, जिल्हा गॅझेटियर भाग १: गोवा, डॉ. व्ही. टी. गुणे, तत्कालीन पुरातत्त्व संचालक, पुरातत्त्व आणि कार्यकारी संपादक आणि सदस्य सचिव, गोवा गॅझेटियर संपादकीय मंडळ यांनी संपादित केले आणि गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाच्या गॅझेटियर विभागाने ते १९७९मध्ये प्रकाशित केले.

गोव्याचा जो नकाशा आज आपण पाहतो तो शिवाजी महाराजांच्या काळात नव्हता. ते तिसवाडी, बारदेश आणि सासष्टी हा भाग असलेल्या जुन्या काबिजादीपुरता मर्यादित होता. १७८८पर्यंत पेडणे, डिचोली, सत्तरी, फोंडा, केपे, सांगे आणि काणकोण हे भाग नवीन काबिजादीत एस्तादो दे इंडियामध्ये जोडण्यात आले.

कोकणात नवीन आरमार स्थापन करण्याची घोषणा शिवाजी महाराजांनी केली आणि दाराशी आलेल्या या संकटाकडे दुर्लक्ष करणे पोर्तुगिजांना शक्य नव्हते, हे आपण समजून घेतले पाहिजे. भिवंडी, कल्याण आणि पनवेल येथे मराठा जहाजे नांगरण्यात आली. त्यांच्याकडे वीस युद्धनौकांचा ताफा व काही व्यापारी होते; खरे तर काही पोर्तुगीज भाडोत्री शिवाजी महाराजांना सामील झाले होते. रुई लीताओ व्हिएगासला त्याच्या ताफ्याचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केले गेले.

शिवाजी महाराजांनी कार्तेझसाठी (हिंदी महासागरात ये-जा करणाऱ्या जहाजांना दिलेला परवाना) पोर्तुगीज अधिकाऱ्यांजवळ विनंती केली होती. पोर्तुगिजांनी नकार दिला कारण त्यांना भीती होती की शिवाजी महाराज त्यांच्या ताफ्याचा वापर त्यांच्याविरुद्ध करतील.

मुत्सद्देगिरीत शत्रूचा शत्रू नेहमीच मित्र मानला जातो, म्हणून शिवाजी महाराजांचा शत्रू असलेला, दांडा-राजापूरचा सिद्दी हा पोर्तुगीजांचा मित्र होता. शिवाजी महाराज खरे तर सिद्दीविरुद्ध आपला ताफा पाठवण्याचा विचार करत होते. शिवाजी महाराजांच्या बाजूने असलेल्या, मदत करणाऱ्यांना आपल्या बाजूने वळवण्यात पोर्तुगिजांना यश आले.

पोर्तुगीज नौदल कितीतरी वरचढ होते; परंतु जमिनीवर, शिवाजी महाराज हे त्यांच्या बार्देश आणि सासष्टीच्या प्रदेशांसाठी धोका होते. १६६४च्या अखेरीस शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून कुडाळ, पेडणे आणि डिचोली ताब्यात घेतले.

या प्रदेशातील देसाईंनी बार्देशमध्ये आश्रय घेतला तेथून ते अनेकदा शिवाजी महाराजांच्या प्रदेशात घुसत. त्यामुळे पोर्तुगिजांनी त्यांच्या शत्रूंना संरक्षण देत असावेत असा संशय मराठ्यांना होता. १६६५च्या पूर्वार्धात, पोर्तुगिजांच्या पाठिंब्याने, देसाईंनी फोंडा येथील आदिलशाही चौकीला मदत केली. मराठ्यांचा विरोध होऊनही काहीही फरक पडला नाही.

१६६६मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाही प्रदेश असलेल्या फोंड्याला वेढा घातला. पोर्तुगिजांनी गुप्तपणे आदिलशाहच्या चौकीला दारूगोळा पुरविला आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सैन्याचा यशस्वी प्रतिकार करण्यात मदत झाली.

१६६७साली बार्देशमध्ये आश्रय घेतलेल्या देसाईंच्या विरोधी कारवायांमुळे शिवाजी महाराजांनी बार्देशवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. ती आर्थिक गरजदेखील असू शकते. पोर्तुगीज-मराठा संघर्षात उतरलेली तिसरी आघाडी म्हणजे डच.

नारोबा सावंत या देसाईने पोर्तुगिजांच्या मदतीने शिवाजी महाराजांच्या आश्रयाखाली असलेल्या वेंगुर्ला येथील डच कारखान्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे डचांनी बार्देशवरील हल्ल्याच्या प्रसंगी शिवाजी महाराजांना दारूगोळा पुरवला.

हा हल्ला २० ते २२ नोव्हेंबर असे तीन दिवस चालला आणि परिणामी अनेकांना युद्धकैदी म्हणून नेण्यात आले आणि दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक मारले गेले. मारले गेलेल्यांमध्ये तीन-चार कॅथलिक पंथगुरू आणि काही ख्रिश्चनांचा समावेश होता.

शिवाजी महाराजांनी माघार घेतली कारण त्यांना महिन्याच्या २२ तारखेला व्हाईसरॉयच्या वैयक्तिक नेतृत्वाखालील शंभरहून कमी लोकांच्या तुकडीची भीती होती, असा दावा पोर्तुगीज व्हाइसरॉयने केला

पुढच्याच महिन्यात, ५ डिसेंबर रोजी बंदिवानांना सोडणे, देसाईंनी शिवाजी महाराजांच्या भूमीत अतिक्रमण केल्यास त्यांना गोव्यातून हद्दपार करणे अशा करारावर स्वाक्षरी करण्यात आली. हा करार काही अटी व शर्तींवर करण्यात आला.

कर भरण्याच्या अधीन असलेले व्यावसायिक संबंध, भविष्यातील सर्व वादांमध्ये शस्त्रे हाती घेण्यापूर्वी प्रथम वाटाघाटी आणि पोर्तुगिजांना अटी मान्य असल्यास शिवाजी महाराजांना शस्त्रे विकणे, आदी अटी यात होत्या.

१६७४मध्ये राज्याभिषेकानंतर पोर्तुगिजांनी दमणहून चौथाईचा कर भरण्यासाठी विलंब केल्यामुळे शिवाजी महाराज रागावले. पोर्तुगीज हा कर रामनगरच्या राजाला देत होते ज्याने हा कर भरण्याच्या अटीवर काही प्रदेश पोर्तुगिजांना दिला होता.

जून १६७२मध्ये शिवाजी महाराजांनी रामनगरच्या राजाचा पराभव केला आणि पोर्तुगिजांकडे चौथाईची मागणी केली. १६७५मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा फोंड्याला वेढा घातला. यावेळी व्हॉइसरॉयने तटस्थ असल्याचे भासवून रसद आणि सैनिकांसह दहा लहान जहाजे गुप्तपणे पाठविली.

पण, हे सर्व शिवाजी महाराजांच्या हाती लागले. अर्थातच व्हाइसरॉयने आपण मदत केल्याचे नाकारले. शेवटी त्याच वर्षी फोंडा प्रदेश शिवाजी महाराजांच्या ताब्यात गेला.

१६७७मध्ये त्यांच्याकडे जमा झालेल्या चौथाईच्या पैशांनी शिवाजी महाराजांशी लढा चालू ठेवण्यासाठी रामनगरच्या राजाला पोर्तुगिजांनी गुप्तपणे मदत केली. त्याच वर्षी शिवाजी महाराजांनी रामनगरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले. शिवाजी महाराजांनी गोव्यावर हल्ला करण्याची तयारी केली, परंतु १६८०मध्ये त्यांच्या अकाली मृत्यूने हे घडू दिले नाही.

संभाजी महाराजांच्या काळातही पोर्तुगीज-मराठा संबंध कायम राहिले. १६८९मध्ये मुघलांनी संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर, राजाराम महाराजांचा १७००मध्ये मृत्यू होईपर्यंत आणि त्यानंतर पेशव्यांच्या काळातही हा लढा चालू राहिला.

पोर्तुगीज आणि भोसले यांच्यातील १७८८च्या तहामुळे पोर्तुगिजांना त्यांच्या सर्व स्वाधीन केलेल्या जमिनी परत मिळण्यास मदत झाली आणि एस्तादो दी इंडियाच्या त्यांचे प्रदेश नवीन काबिजादीत समाविष्ट केले.

डॉ. पिसुर्लेकर यांनी उद्धृत केलेल्या राजनैतिक पत्रव्यवहारावरून असे दिसून येते की पोर्तुगीजांचे शिवाजी महाराजांशी असलेले संबंध सावध, मैत्रीपूर्ण तसेच तटस्थ व शत्रुत्वाचे होते. इतिहासातून धडा घ्यायला हवा.

भूतकाळाने आपल्या भविष्याला कधीही त्रास देऊ नये. इतिहासाने व्यक्ती आणि समुदायांमध्ये चांगले सौहार्द निर्माण करण्यास मदत केली पाहिजे. पोर्तुगीज वसाहतवादाविरुद्ध लढताना गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नात जात आणि पंथ यांना फारसा अर्थ नव्हता. अकबर, शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि मदर तेरेसा यांनीही हेच केले होते.

त्यांच्यापैकी प्रत्येकजण जागरूक होता आणि त्यांना स्वतःचे पुतळे बसवण्याच्या कल्पनेचा तिरस्कार वाटत असे. इतिहासाचा वापर आणि गैरवापर केला जातो तेव्हा संशयाची सुई नेहमीच नेते आणि राजकारण्यांकडे वळते.

अशा प्रकारे आपण फूट पाडणाऱ्या शक्तींपासून दूर राहण्याची आणि त्याऐवजी इतिहासातून जे सकारात्मक आहे ते घेण्याची आपली स्वतःची जबाबदारी सोडून देतो. शिवाजी महाराज हे एकतेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक होते. आज आपण त्यांच्या पुतळ्यावरून भांडतो आणि त्यांची एकात्मतेची दृष्टी विसरतो हे दुर्दैव!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT