सपना सामंत
Water Shortage in Goa: सत्तरी तालुक्यातील ७० टक्के गावांना पिण्याचे पाणी दाबोस पाणी प्रकल्पामधून पुरवले जाते. मात्र, सत्तरीतील बहुतांश गावांमध्ये अजूनही दररोज व नियमित टॅंकरव्दारेच पाणी पुरवठा केला जातो.
सत्तरी पाण्याची टंचाई याचे मुख्य कारण म्हणजे नळजोडणीला निगडीत जलवाहिनी कमी व्यासाची असून पाणी जादा दाबाने सोडले जात असल्याने वारंवार जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहेत,परिणामी पाणी पुरवठा ठप्प होऊन पाणी टंचाई उद्भवते. संबंधित अधिकारी वा कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असते. त्यामुळे नागरिकांनीही जागृती राहिले पाहिजे. आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली पाहिजे. आता एप्रिल महिना सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी पाणी समस्या उद्भवत आहे, पाणी समस्येवर तोडगा न निघाल्यास गावा-गावातून संतप्त ग्रामस्थांचे मोर्चेसुध्दा निघू शकतात,अशी स्थिती आहे.
सावर्डे पंचायत क्षेत्रातील बंदीरवाडा भागात काहीच घरांची वस्ती असून त्या ठिकाणी नळजोडणी नाही. त्यामुळे टॅंकरव्दारे २-३ दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो.
म्हणून टॅंकर लागतात !
सत्तरीत काही भागात दिवसाकाठी २ किंवा दोन वेळा पाणी सोडले जाते. तर काही भागात दिवसाला फक्त एकवेळ पाणी सोडले जात आहे. ते सुध्दा २ किंवा ३ तास. काही भाग डोंगरमाथ्यावर असल्याने पाणी पुरवणारी जलवाहिनी कमी व्यासाची असल्याने पाणी वर चढत नाही. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. परिणामी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते,आणि टॅंकरवर अवलंबून रहावे लागते.
चरावणे धरण झाल्यास १५ गावांचा पाणीप्रश्न सुटेल !
चरावणे धरण झाले तर ठाणे पंचायतीबरोबर म्हाऊस पंचायत व नगरगाव पंचायतीला हा प्रकल्पाचा फायदा होणार आहे. व सुमारे १५ गावांना सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प व्हावा, अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.
भिरोंडा पंचायत क्षेत्रात नवी जलवाहिनी : सार्वजनिक पाणी पुरवठा खात्यातर्फे वांते येथे १ एमएलडी प्रेशर फिल्टर प्लांट स्थापित करण्यात येणार आहे. , ज्यामध्ये जॅक वेल पंप हाऊस टाकी बांधणे आणि डीआय राइजिंग आणि डिस्ट्रिब्युशन मेन टाकणे समाविष्ट आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले असून ते मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या नवीन जलवाहिनी घालण्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे भिरोंडाबरोबर इतर पंचायतींनाही त्याचा लाभ होईल. त्यामुळे भिरोंडा पंचायतीतील पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल.
दाबोस प्रकल्पाच्या टाकीची क्षमता वाढवणार !
दाबोस पाणी प्रकल्पाची क्षमता १५ एमएलडी आहे. मात्र, या प्रकल्पाची क्षमता निदान १० एमएलडी क्षमतेने वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. तसे झाल्यास सत्तरी तालुक्याच्या सध्याच्या गरजेनुसार समाधानकारक पाणीपुरवठा होऊ शकतो.
दाबोस पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून नगरगाव, सावर्डे ,ठाणे, वाळपई नगरपालिका, म्हाऊस, होंडा भिरोंडा काही भाग व खोतोडा आदी ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे.
दाबोस प्रकल्पाची टाकीचा क्षमता वाढविली जाणार आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे सत्तरीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.