Sasashti News :
सासष्टी, ऑक्टोबर २००४ साली आमच्या समाजातील आठ संघटना एकत्र येऊन युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स म्हणजेच ‘उटा’ ही संघटना स्थापन झाली. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असले, तरी अजूनही या आठ संघटना एकत्र आहेत.
आमच्यात गटबाजी नाही, असे ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
मडगाव येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला अध्यक्ष प्रकाश वेळीप यांच्यासह दुर्गादास गावडे, विश्र्वास गावडे, रुमाल्ड फर्नांडिस, सतीश वेळीप, अनिल गावकर, इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावर्षी दहा हजार समाज बांधवांना एकत्रित आणले जाईल. दहावी व बारावीतील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जाईल, अशी माहिती प्रकाश वेळीप यांनी दिली.
राजकीय आरक्षणाचा मुद्दा लोकसभा निवडणूक निकालानंतर परत एकदा उठवला जाईल. व्यावसायिक महाविद्यालयांमधील समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या आरक्षणाचा मुद्दाही उठवला जाईल. एकलव्य प्रशिक्षण योजना त्वरित लागू करण्याची, काजू शेतीसाठी जमिनीच्या सनदा देण्याचीही आमची मागणी आहे, असेही वेळीप यांनी स्पष्ट केले.
‘‘उटा’ गावडेंच्या पाठीशी’
सभापती रमेश तवडकर यांना संघटनेचे विचार पटत नसल्याने ते बाजूला गेले. याचा अर्थ ‘उटा’ संघटनेमध्ये गटबाजी आहे असा होत नाही, असे प्रकाश वेळीप म्हणाले. कला व संस्कृती तथा क्रीडामंत्री गोविंद गावडे हे स्पष्ट वक्ते आहेत. आमच्या काही मागण्यांसाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले, तर त्यात काय चूक आहे? असा प्रश्र्न करून वेळीप यांनी ‘उटा’चा मंत्री गावडे यांना पूर्ण पाठिंबा आहे व उटा त्यांच्या पाठीशी आहे, असे सांगितले.
‘आदिवासी भवनासाठी निविदा जारी
आमच्या समाजासाठीच्या योजना संथगतीने चालू आहेत. आदिवासी भवनासाठीचा पाया दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घालण्यात आला होता. मात्र, त्यापुढे अजून काहीही झालेले नाही. आम्हाला केवळ आश्र्वासनेच मिळतात. हा जवळ जवळ ७० ते ८० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या भवनासाठी लवकरात लवकर सरकारने निविदा जारी करावी, अशी मागणी प्रकाश वेळीप यांनी केली.
‘वाडा तिथे उटा’ उपक्रम : उटा संघटनेचा संघर्ष आत्ताच्या पिढीला कळावा यासाठी संघटनेच्या द्विदशकपूर्तीनिमित्त ‘वाडा तिथे उटा’ हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती वेळीप यांनी यावेळी दिली. या उपक्रमांतर्गत सर्व तालुक्यांत ज्या ज्या वाड्यांवर आमच्या समाजाचे लोक राहतात, तिथे जाऊन बैठका घेतल्या जातील. या बैठकांमध्ये सरकारच्या योजनांबद्दलची माहिती देण्यात येईल.
त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. या बैठका सर्व तालुक्यांमध्ये ६ ते ११ जून या कालावधीत घेतल्या जातील. त्यानंतर १६ जून रोजी चिंतन मंथन करण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाईल. या सर्व बैठकांमध्ये मंत्री गोविंद गावडेसुद्धा मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती प्रकाश वेळीप यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.