पणजी, रस्ते वाहतुकीवरील ताण आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील प्रमुख शहरे लोहमार्गाने तसेच मेट्रोनेही जोडण्याची योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बोलावलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठकीत सादर केली.
यासाठी टप्प्या-टप्प्याने मिळून एकूण ५ हजार कोटी रुपयांची गरज भासेल. हे काम कोकण रेल्वेकडे सोपविता येईल. केंद्र सरकारने कोकण रेल्वेला यासाठी अर्थसाहाय्य करावे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते पेडणे रेल्वेस्थानक असा लोहमार्ग घालण्याचाही प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी सादर केला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, रस्ते वाहतूक आता कमालीची वाढली आहे. कृत्रिम प्रज्ञेवर चालणारी सिग्नल यंत्रणा उभारूनही वाहतूक कोंडीवर उपाय काढता आलेला नाही.
त्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचाच विचार करावा लागणार आहे. यासाठी मेट्रोच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे. पूर्वीच्या सरकारने मोनोरेल व मेट्रोचाही विचार केला होता, असे मला सांगण्यात आले. त्याचा पाठपुरावा केला गेला असता तर आज ही स्थिती उद्भवली नसती. आमच्या भाजप सरकारने अटल सेतू, नव्या झुआरी पुलाचे काम केले, म्हणून आज वाहतुकीची तितकी समस्या निर्माण झाल्याचे जाणवत नाही. राज्यात विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. काही कामे सरकारने ‘नाबार्ड’कडून अर्थसाहाय्य घेऊन सुरू केली आहेत. ती पुढे नेणे ग्रामीण विकासासाठी आवश्यक आहे. यासाठी ८ कोटी रुपये लागणार आहेत.
म्हादई पाणीवाटपाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांसाठी आणि येत्या वर्षभरात लोकप्रतिनिधींच्या मागण्यांनुसार हाती घ्यावयाच्या विकासकामांसाठी १ हजार कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यातील सौरऊर्जा निर्मिती, पणजी सौरशहर म्हणून विकसित करणे, धरण, तसेच मोकळ्या जागांवर वीजनिर्मिती करण्यासाठी भरीव आर्थिक मदत मिळावी, असेही नमूद केले आहे.
५ हजार कोटींची आवश्यकता : कोकण रेल्वेकडे जबाबदारी
मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर ‘गोमन्तक’ला सांगितले की, रस्ता रुंदीकरणाला मर्यादा आहेत. वाहनांची संख्या राज्यात वाढली आहे. रेल्वेचा विकास राज्यात झाला तर खात्रीशीर अशा रेल्वे वाहतुकीचा पर्याय लोक निदान दोन शहरांमधील वाहतुकीसाठी करतील. फोंडा, वास्को, म्हापसा आदी शहरे लोहमार्गाने जोडावी लागणार आहेत. लोहमार्ग शक्य नसेल, त्याठिकाणी पूल उभारून मेट्रो रेल्वे सुरू करता येईल.
मोपा विमानतळाचा पेडण्याला जोड
ही रेल्वे सेवा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. मोपा विमानतळ ते पेडणे रेल्वे स्थानक जोडले गेल्यावर विमानतळावरून बाहेर येण्यासाठी प्रवासी त्याचा वापर करतील. दिल्ली, मुंबई आदी शहरांत लोक मोठ्या प्रमाणात मेट्रोचा वापर करतात. भरंवशाची सेवा म्हणून त्याकडे पाहिले जाते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सेंट झेवियर शवदर्शन : ३०० कोटींची मागणी
यंदा सेंट झेवियर शवदर्शन सोहळा आहे. जगभरातून मिळून २० लाख भाविक यानिमित्ताने जुने गोवेत येणार आहेत. त्यांच्यासाठी सुविधा तयार कराव्या लागणार आहेत. या खेपेला आम्ही सुविधा वारंवार निर्माण कराव्या लागणार नाहीत, असा विचार करून काही कायमस्वरूपी व तेथे भेट देणाऱ्या पर्यटक व भाविकांना त्या सुविधांचा भविष्यातही वापर करता यावा, अशा सुविधांची निर्मिती करणार आहोत. यासाठी केंद्र सरकारने ३०० कोटी रुपयांचे अनुदान राज्य सरकारला द्यावे, अशी मागणी केली आहे.
धरणांसाठी ७०० कोटींची गरज
म्हादई जलवाटप तंटा लवादाच्या निर्णयानुसार गोव्याच्या वाट्याला येणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी काही ठिकाणी धरणे बांधण्याची योजना आहे. यासाठी राज्यासमोरील कच्चे पाणी आणि पेयजल यांचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी अडविण्यावर भर दिला जाणार आहे.
यासाठी अनेक ठिकाणी बंधारे बांधावे लागतील. त्यासाठी ७०० कोटी रुपये केंद्राने अर्थसाहाय्य द्यावे, असे अर्थसंकल्पपूर्व बैठकीत सादरीकरण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.