पणजी, माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच उत्पल पर्रीकर यांच्याविषयी मनात कोणतीही अढी नाही. हे दोन्ही नेते विचाराने दूर न गेल्याने त्यांचे समर्थक लोकसभा निवडणुकीत भाजपलाच मतदान करतील.
उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक हे लाखांच्या मताधिक्याने तर दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपे या ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला. सध्या अनेकजण भाजपमध्ये फेरप्रवेश करत आहेत. त्यात काही माजी आमदारांचाही समावेश आहे.
हे निर्णय प्रदेश पातळीवर होतात. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी नेत्यांनी भाजपमध्ये यावे असे मला वाटणे साहजिकच आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर व उत्पल पर्रीकर यांच्याबाबत केंद्रीय पातळीवर जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल.
भाजपची विचारधारा मानणारे सर्वजण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी काम करत आहेत, असेही ते म्हणाले.
सासष्टीतील तीन मतदारसंघांत भाजपला आघाडी मिळणार नाही हे मान्य असले तरी आठ मतदारसंघांत जास्तीत जास्त मते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या खेपेस ९ हजार मतांनी विजयाने हुलकावणी दिली होती. त्यावेळी मगो पक्ष भाजपसोबत नव्हता. फोंड्यात रवी नाईक, मडगावात दिगंबर कामत भाजपसोबत नव्हते. केपेत बाबू कवळेकर भाजपविरोधात होते. हे सारे आज भाजपसोबत आहेत, ही जमेची बाजू आहे, असे तानावडे म्हणाले.
श्रीपाद नाईक हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व
श्रीपाद नाईक कधी कोणाशी सूडबुद्धीने वागले नाहीत ही त्यांची जमेची बाजू आहे. राज्य पातळीवरील विषय खासदार म्हणून अनेकजण त्यांच्यासमोर मांडत आहेत. प्रेमापोटी हक्काने विषय मांडणारे आधीही व नंतरही भाजपसोबतच आहेत. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जनता मतदान करेल, असे सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप हे म्हापसा अर्बनचे अध्यक्ष होते. त्यांनी मगोला दगा दिला. त्याचा खुलासा त्यांना करावा लागेल. त्यांना प्रचार करायचा नसल्याने ते सध्या चर्चेची आव्हाने सध्या देत आहेत. यापेक्षा जो काही तुटपुंजा वेळ त्यांच्याकडे आहे, तो त्यांनी प्रचारात सत्कारणी लावला तर त्यांना चार मते मिळतील, असा टोला तानावडे यांनी लगावला. निवडणूक झाल्यावर खलप म्हणतील त्या विषयावर चर्चा करू, असेही ते म्हणाले.
लक्ष्मीकांत पार्सेकर व उत्पल पर्रीकर यांनी भाजप सोडण्यापूर्वी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्याशी चर्चा केली होती. यामुळे त्यांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णयही केंद्रीय पातळीवरच होइंल. या दोघांनाही पक्षाची शिस्त माहीत आहे.
- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.