सासष्टी, सध्या गोव्यातच नव्हे, तर देशभरात रस्त्यांवर असंख्य अपघात होत असून अनेकजण मृत्युमुखी पडतात.
रस्ता अपघात हा जटिल प्रश्र्न बनला असून तो सोडविण्यासाठी समाजातील सर्व स्तरांवर जागृती करणे आवश्यक आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात वाहतूक नियमांचा समावेश करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो, असे मत निवृत्त डीआयजी बॉस्को जॉर्ज यांनी मडगावात व्यक्त केले.
‘मार्ग’ संस्थेने मडगाव पालिका सभागृहात ‘रस्ता सुरक्षेत नागरिकांची भूमिका’ या विषयावर आज चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. जॉर्ज म्हणाले की, रस्ता सुरक्षा अभियानात वाहतूक पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते.
पण प्रत्येकवेळी पोलिसांनाच जबाबदार धरून चालणार नाही. प्रत्येकाला वाहतुकीचे नियम, रस्त्यावरील सूचना माहीत असाव्यात. ‘मार्ग’चे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी स्वागत केले, सचिव अनंत अग्नी यांनी सूत्रसंचालन, तर उपाध्यक्ष आवडा व्हिएगस यांनी आभार मानले.
परवान्यासाठी कठोर चाचणी हवी
मुलांना वाहन चालविण्यास देणे पालकांनी टाळावे, तसेच शाळांनी त्यावर नियंत्रण ठेवावे. गोव्यात परवाना देण्याची पद्धत अतिशय सोपी आहे.
खासकरून युवकांना परवाना देताना त्यांची कठोर चाचणी घ्यावी. वाहतूक कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी नियुक्त करणे, शाळांमध्ये वाहतूक समिती नियुक्त करणे, जिल्हाधिकारी व पोलिसांनी वाहतूक नियमांची नियमित माहिती देणे वगैरे पद्धतींचा अवलंब करावा, असा सल्ला जॉर्ज यांनी दिला.
४३ टक्के अपघात रात्री
रात्री वाहतूक कमी असते, तरीही ४३ टक्के अपघात रात्रीच्या वेळी होतात, यावरसुद्धा अभ्यास होणे आवश्यक आहे.
गतीवर नियंत्रण नसणे, दारू पिऊन वाहन चालविणे, सिग्नल्स न पाळणे, घातक ओव्हरटेकींग, वाहने योग्य प्रकारे न ठेवणे, रस्त्यावरील मार्गिकांचा नियम न पाळणे, अशी कारणे जॉर्ज यांनी विषद केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.