Canacona : निसर्स अन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. निसर्गात सर्व ऋतूत वर्षभर पौष्टिक भाज्या उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. मात्र, आधुनिक काळात या निसर्गधनाकडे मानवाने पाठ फिरवली व रासायनिक खतांचा मारा करून पिकवलेल्या परदेशी भाज्यांची ओढ आम्हाला लागली. ग्रामीण भागातही हे लोण पोचले.
पण सध्या फुकटात मिळणाऱ्या निसर्गदत्त भाज्या चढ्या दराने शहरी बाजारात विकल्या जात असल्याचे दिसते. शहरवासीयांनी या भाज्यांचे मूल्य जाणले, हेही नसे थोडके. अळूच्या पानांना सध्या मागणी वाढली आहे.
पावसाळ्याच्या सुरवातीला रानटी सुरणाचे कोंब जमिनीतून बाहेर येऊ लागतात.त्या कोंबांची पातळ आठल्या, व्हडयो घालून व लसणीची फोडणी देऊन पातळ रूचकर भाजी केली जाते. रूचीसाठी कोळंबी,तिसऱ्या घालून कालवण केले जाते.
सुरणाच्या कोंबाचा बहर पावसाळा सुरू झाल्यानंतर दोन आठवडे असतो. त्या काळातच बांबूच्या कोंबाचे म्हणजेच किल्लांचा मौसम सुरू होतो. कोंब बारीक किसून सुकी किंवा पातळ भाजी केली जाते.त्याशिवाय किल्लाच्या फोडी मिठात घालून त्याची साठवणही करण्याची प्रथा गोव्यात आहे. याच काळात जंगलात शिरमंडळीची भाजी तयार होत असते. वेलीला आलेली त्रिशुळाच्या आकाराची गुळगुळीत पानांची डाळ घालून केलेली भाजी रूचकर तर असतेच ती पौष्टिकही आहे.
टाकळा, तेरो ही सर्रास मिळणाऱ्या भाजीची याच काळात उपज होते.टाकळा हा कृमी नाशक तर तेरो ही लोह जीवनसत्वाचा स्तोत्र आहे.त्याशिवाय शेवग्याच्या (मशिंग) कोवळ्या पानांच्या भाजीचे याच काळात सेवन केले जाते.
श्रावणात त्या भाजीचे सेवन निषिद्ध मानले जाते. कारण श्रावणात शेवग्यात फुलधारणा होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यावेळी पानामधील जीवनसत्वात भरपूर प्रमाणात वाढ होते, त्याकाळात पानांचे सेवन अपायकारक ठरू शकते.
अळू वर्गातील भाजीचे औषधी गुणधर्म
अळू हे थंड, भूक वाढवणारं आणि मलमूत्र स्वच्छ करण्यास मदत करणारे आहे.बाळंतिणीला दूध येण्यासाठी अळूची भाजी द्यावी. तिने अळू आणि मेथी यांची मिश्र भाजी रोज खाल्ल्यास भरपूर आणि सकस दूधवृद्धी होते.
नुसत्या अळूचा आहारात उपयोग केला, तरी फायदा होतो. अळूची भाजी रक्तवर्धक आहे. अळूची देठं जाळून त्याची राख खोबरेल तेलातून फोडावर लावल्यास फोड फुटतो. गांधीलमाशी किंवा इतर विषारी किटक चावला, तर अळू फुफाट्यात भाजून त्याचा रस पोटात घ्यावा आणि दंशस्थानीही लावावा.
झाडावरील अळूच्या (राजाळू) ताज्या मुळ्या भाजून, त्या बारीक वाटून लहानशा सुपारीएवढी गोळी करून पोटात घ्यावी आणि वर गरम पाणी प्यावे. रोज असे घेतल्यास कोळ्याचे विष उतरते. रोगाळू (झाडावर उगवलेले) अळूचा कांदा शिळ्या पाण्यात उगाळून त्याचा गंडमाळेवर लेप दिल्यास गंडमाळेच्या त्रासापासून सुटका होते.
असाही होतो वापर!
तेरो, तेरी,अळूचे विविध प्रकार सर्वांनाच परिचयाचे आहेत.मात्र, पावसाळ्यात झाडांवर अळू वर्गातील वाताळू ही अळू सारखी पाने असलेली वनस्पती उगवते.अळू सारखी भाजी किंवा अळू वड्या करण्यासाठी या पानांचा उपयोग करण्यात येतो.
हे अळू वातनाशक आहे म्हणूनच वाताळू. त्याशिवाय काळे अळू,पांढरे अळू, तिरूपतीचे अळू, कसाळी अळू असे वेगवेगळे प्रकार गोव्यात आहेत. त्यापैकी कासाळी अळूच्या पानांची भाजी सहसा खात नाहीत. मात्र, तिच्या माडीचा उपयोग भाजीत केला जातो. चतुर्थीला कासाळीची पाने गौरी पूजनात वापरतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.