आगामी लोकसभा निवडणुकीची केवळ भारतातच नाही तर जगभरात चर्चा आहे. भारतात जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी देशभरात भाजपचा प्रचार करत आहेत, तिथे विरोधकही त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. पीएम मोदींची पाकिस्तानातही सातत्याने चर्चा होत आहे, पाकिस्तानच्या जनतेसोबत तिथले नेतेही पीएम मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येतील की नाही यावर लक्ष ठेवून आहेत.
पाकिस्तानचे एअर मार्शल शहजाद चौधरी यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या भविष्यातील योजना आणि भारतीय विरोधकांनी भाजपला दिलेले आव्हान याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ही निवडणूक पंतप्रधान मोदींची शेवटची निवडणूक असल्याचेही शहजाद चौधरी म्हणाले.
शहजाद चौधरी म्हणाले की, ''2014 मध्ये सत्तेत आल्यापासून पंतप्रधान मोदींनी आपल्या निर्णयांच्या माध्यमातून पाकिस्तानवर (Pakistan) दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या परराष्ट्र धोरणामुळे ते पाकिस्तानवर दबाव आणू शकतील असे त्यांना वाटत होते पण तसे झाले नाही. मोदींच्या दोन्ही टर्ममध्ये पाकिस्तानने काश्मीरबाबतची आपली भूमिका कधीही बदलली नाही आणि काश्मीरसाठी सातत्याने आवाज उठवत राहिला.''
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येण्याबाबत शहजाद चौधरी म्हणाले की, ''मोदींची ही शेवटची टर्म असेल, त्यामुळे ते चांगला वारसा सोडण्याचा प्रयत्न करतील. कलम 370, राम मंदिर हे मुद्दे त्यांच्या अजेंड्यामध्ये होते. ते सत्तेत परत आल्यास पाकिस्तानशी संबंध सुधारु शकतात.'' चौधरी यांच्या बोलण्याचा सारांश असा होता की, पंतप्रधान मोदी यावेळी सत्तेवर आले तर ते अनेक वाद मिटवण्याचा प्रयत्न करु शकतात, जेणेकरुन भविष्यात त्यांच्या कार्याची आठवण ठेवता येईल.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या आव्हानावर शहजाद चौधरी यांनी सांगितले की, ''भारतातील (India) अनेक राज्यांमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आणि युती करुनही विरोधकांना त्यात विजय मिळवता आला नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखणे कठीण आहे.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.